नायगाव : सिन्नर तालुक्यातील नायगावसह नऊ गाव पाणीपुरवठा योजना नियोजनाअभावी कोलमडली आहे. परिणामी दोन महिन्यांपासून जायगावला कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली असून, ऐन पावसाळ्यात महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे. नायगावसह नऊ गाव पाणीपुरवठा योजनेचा जायगाव येथील कर्मचाऱ्याची सिंहस्थ कुंभमेळ्यासाठंी नाशिक येथे नेमणूक झाल्याचे समजते. तथापि, जायगाव येथे पाणीपुरवठ्याची पर्यायी व्यवस्था करण्यासाठी कोणाचीही नेमणूक केलेली नाही. कर्मचारीच नसल्याने मीटर रिडिंग घेण्यासाठी कोणीही कर्मचारी येत नसल्याने ग्रामस्थांच्या अडचणींत भर पडली आहे.देशवंडी येथील पाणीपुरवठा कर्मचारी आठवड्यातून एकदा येऊन पाणीपुरवठा करत होता; मात्र, काही दिवसांपूर्वी योजनेची जलवाहिनी फुटली असून, कर्मचाऱ्यांअभावी तिची दुरुस्ती रखडली आहे. त्यामुळे जायगाव येथे कृत्रिम पाणीटंचाईसह पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. वेळेत पाणी मिळत नसल्याने महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे. नायगावसह नऊ गाव पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी व जायगाव येथे पाणीपुरवठा कर्मचाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. (वार्ताहर)
जायगाव येथे कृत्रिम पाणीटंचाईची समस्या
By admin | Updated: September 22, 2015 22:31 IST