सातपूर : संभाव्य अपघात टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी पतंग उडविताना विद्युत तारांमध्ये अडकलेले पतंग काढण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन महावितरणचे कार्यकारी अभियंता अंकुश कावळे यांनी केले आहे.सातपूर कॉलनीतील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात आयोजित जनजागृती कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कावळे यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधताना सांगितले की, मकर संक्रांतीनिमित्ताने शहरात सर्वत्र विद्यार्थी पतंग उडविण्याचा आनंद साजरा करतात. बऱ्याच वेळा प्रभावित विद्युत तारांमध्ये अडकलेले पतंग लोखंडी तारेने काढण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे मोठा अनर्थ घडल्याच्या घटना घडलेल्या आहेत. या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी विद्यार्थ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे पालकांनीदेखील आपल्या पाल्यांकडे लक्ष द्यावे, असेही आवाहन त्यांनी केले. यावेळी कनिष्ठ अभियंता पी. एम. गवई, शैलेंद्र बांगरे उपस्थित होते.प्रास्ताविक मुख्याध्यापक जयश्री पाटील यांनी केले. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव देवराम पूरकर होते. महावितरणच्या वतीने सातपूर परिसरातील विविध शाळांमध्ये जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली. याप्रसंगी बाळासाहेब पोरजे, कारभारी बोडके, गोपाळ बगडे, विजय जाधव, अभय राव, मोहन लोखंडे, विजय अढांगळे, प्रफुल्ल पगारे, शिवाजी कुटे, अल्ताफ शेख आदिंसह पालक, विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
विद्युत तारांमधील पतंग न काढण्याचे आवाहन
By admin | Updated: January 10, 2016 23:26 IST