सटाणा : सलग चार वर्षांपासून बागलाण तालुका गारपीट, अवकाळी पाऊस या अस्मानी संकटाचा सामना करत आहे. याच आस्मानी संकटामुळे कधीकाळी असलेले डाळिंबाचे आगार पूर्णपणे नेस्तनाबूत झाले आहे. त्यातच अभूतपूर्व दुष्काळाचा सामना करत उन्हाळ कांदा, भाजीपाला पिकवत असताना यंदा तरी या गारपीट आणि अवकाळी पावसाचे ग्रहण सुटेल आणि ऋतुचक्र पूर्ववत होईल. पाऊस चांगला पडेल या आशेने बळीराजा शेतीची कामे आटोपत मे महिना पास करत असताना रविवारी सायंकाळी मात्र अचानक विजांच्या कडकडाटासह झालेल्या अवकाळी गारपिटीने क्षणात होत्याच नव्हत केले.बागलाण तालुक्याचा यंदाही गारपीट आणि अवकाळी पावसाने पिच्छा सोडला नसल्याचे बळीराजाला रविवारी अनुभवायला मिळाले. दीड तासातच गारांसह सरासरी अठ्ठेचाळीस मिलिमीटर पाऊस कोसळला. प्रचंड वादळी पावसामुळे शेतात काढलेला उन्हाळ कांदा भिजला, तर बहुतांश ठिकाणी चाळींमध्ये साठवून ठेवलेला कांदा चाळींवरचे पत्रे उडाल्याने भिजून लाखो रुपयांची हानी झाली. दरेगाव, दसवेल, राजापूर, कातरवेल, पिंपळकोठे, नांदीन, वाडीपिसोळ, सोमपूर, तांदूळवाडी, भडाणे, लाडूद, जायखेडा, ब्राह्मणपाडे, आसखेडा, द्याने, श्रीपूरवडे, तळवाडे, करंजाड, बिजोटे, निताणे, पारनेर, वीरगावपाडे, दसाणे, केरसाणे, डांगसौंदाणे आदि भागात दीड तास मुसळधार अवकाळी पाऊस कोसळला. ब्राह्मणपाडे, नांदीन, वाडीपिसोळ, मेंढीपाडे येथे प्रत्येकी एका शेतकऱ्याच्या घरावरील पत्रे उडाले तर बहुतांश ठिकाणी कांदाचाळीचे पत्रे उडाल्याने कांदा भिजून लाखो रु पयांचे नुकसान झाले.द्याने : तालुक्यातील द्याने परिसराला वादळी पावसाने झोडपून काढले. वीज पडून १४ मेंढ्या, सहा शेळ्या ठार झाल्या.फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गेल्या दोन दिवसांपूर्वी रंजन नरहर कापडणीस यांच्या शेतात अण्णा पदाजी हळणार, रा.टिपे यांच्या शंभर मेंढ्यांचा कळप चराईसाठी थांबल्या होत्या. मात्र रविवारी सायंकाळी ६ वाजेदरम्यान जोरदार वादळी वारे व विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. त्याच वेळी अचानक जोरात वीज कडाडून बाजूला उभ्या असलेल्या चौदा मेंढ्या व सहा बकऱ्यावर कोसळल्याने जागीच ठार झाल्या. सरपंच मधुकर कापडणीस यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची माहिती घेतली व महसूल अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. (लोकमत चमू)
अवकाळीचा शेतकऱ्यांना फटका
By admin | Updated: May 9, 2016 22:47 IST