नाशिक : आॅल इंडिया ग्रामीण डाकसेवक युनियनने संपूर्ण देशातील ग्रामीण डाकसेवकांना आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संप करण्याचे आवाहन केल्याने नाशिक जिल्ह्यातील विभागीय शाखेने संप पुकारला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण टपाल शाखा कार्यालयांमधील तब्बल ३३० डाकसेवक बेमुदत संपावर गेल्याने नाशिकच्या विविध तालुक्यांमधील टपालसेवा ठप्प झाली आहे. नाशिक टपाल विभागांतर्गत ग्रामीण भागातील २३५ टपाल कार्यालयांचा बटवडा आजपासून ठप्प झाल्याने ग्रामीण जनतेला पोस्टमनची प्रतीक्षा करावी लागणार आहे. ग्रामीण डाकसेवक युनियनच्या नाशिक विभागीय शाखेनेदेखील बेमुदत संपामध्ये सहभाग नोंदविला आहे. डाकसेवक संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी देशव्यापी संप पुकारला आहे.स्थानिक विभागीय शाखेचे अध्यक्ष आर. एस. जाधव, सचिव सुनील जगताप यांच्या नेतृत्वाखाली मुख्य टपाल कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करत ग्रामीण डाकसेवकांनी ‘आमच्या मागण्या मान्य करा, नाही तर खुर्च्या खाली करा..’, ‘कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही’ अशा घोषणांनी सरकार व टपाल विभागविरोधी सूर आळवला. यावेळी सुमारे पन्नास ते शंभर ग्रामीण डाकसेवकांनी विविध मागण्या व घोषवाक्यांचे फलक हातात घेऊन प्रशासनाचा निषेध नोंदविला. टपाल प्रशासनाकडून मात्र केवळ निम्म्याहुन अधिक ग्राम सेवक कर्मचारी संपात सहभागी झाले नसल्याचे सांगण्यात आले. केवळ एका संघटनेशी संबंधित असलेल्या कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग नोंदविल्याची माहिती मुख्य टपाल कार्यालयाच्या सुत्रांनी दिली आहे. ग्रामीण भागातील टपाल व्यवस्थेचे कामकाज सुरळीत चालावे, म्हणून रोजंदारीवर त्या ठिकाणी कर्मचारी तात्पुरत्या स्वरूपात घेण्याच्या सुचना प्रवर अधीक्षक नाना वानखेडे यांनी पोस्टमास्तरांना दिल्या आहेत. (प्रतिनिधी)
३३० क र्मचारी सहभागी : ग्रामीण डाकसेवकांचा बेमुदत संप
By admin | Updated: March 11, 2015 00:15 IST