खामखेडा : येथील शेतकऱ्याने प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून दुष्काळातही आर्थिक समतोल साधत तीन वर्षांपासूनचे दुष्काळाचे चटके सोसत, अल्पपाण्यावर अडीच एकर शेतीमध्ये हिरव्या मिरचीचं भरघोस उत्पन्न घेत तब्बल पंचवीस लाखांचं उत्पन्न घेत आदर्श निर्माण केला आहे.गारपीट, अवकाळी पाऊस व तीव्र दुष्काळ अशा दुष्टचक्रात पारंपरिक शेतीमधील उत्पादनात घट होत भांडवल निघत नसताना, मोकळ्या शेतात मल्चिंग पेपरचा वापर न करता येथील अशोक अहिरे यांनी आपल्या अडीच एकर शेतीमध्ये पंचवीस लाख रुपयांचे हिरव्या मिरचीचं उत्पादन घेतलंय. कमी पाण्यात इनलाइन सिंचन पद्धतीवर येणारं पीक म्हणून अहिरे यांनी हिरव्या मिरचीचा निवडलेला पर्याय, कमी कालावधीत मिळवलेले उत्पादन जिल्ह्यात कौतुकाचा विषय ठरला आहे.कसमादे परिसरातील देवळा भागात मागील तीन वर्षात गारपीट, अवकाळी पाऊस व नंतर तीव्र दुष्काळ अशी नैसर्गिक संकटांनी शेतकऱ्यांची कसोटी पाहिली. या काळात शेतकऱ्यांच्या शेतातील भांडवलही सुटले नाही. अशा काळात अहिरे यांनी या वर्षी बाजारभावाचा अभ्यास करून हिरव्या मिरचीच्या पिकाची निवड केली.नाशिक येथील एका नर्सरीतून पंचवीस हजार रोपं आणली. ड्रिपच्या जोडणीवर मिल्चिंगचा वापर न करता मिरचीची लागवड केली. रोपं, खते, मजुरी असा सर्व एकत्रित पाच ते सहा लाख रुपयांपर्यंत हा खर्च आल्याचं सांगितले. आतापर्यंत त्यांनी तब्बल पन्नास टन मिरचीची विक्री स्थानिक बाजारात तसेच धुळे, जळगाव, नवापूर, मुंबई अशा बाजारात केली. त्यांच्या मिरचीला सरासरी रुपये ६० ते ६५ रुपये भाव मिळाला. सर्वाधिक ८० रुपये किलोने त्यांनी मिरची विकली. या मिरचीतून पन्नास टनाचे त्यांना जवळपास पंचवीस लाखाहून अधिक पैसे मिळालेत. आणखी पाच सहा टन उत्पादन निघेल, अशी आशा आहे. बाजारभाव पडले नाहीत तर अजूनही उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. यावर्षी तीव्र दुष्काळामुळे मिरचीच्या घेतलेल्या उत्पादनामुळे हंगामभर मिरची तेजीत असल्याने अहेर यांना हिरव्या मिरचीने मालामाल केले. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून दुष्काळातही आर्थिक समतोल कसा टिकून राहतो याचं उदाहरण अशोक अहिरे यांनी घालून दिलंय. (वार्ताहर)
अडीच एकरमध्ये घेतले २५ लाखांचे उत्पन्न
By admin | Updated: September 8, 2016 00:44 IST