विनंती बदल्यांसाठी १५० अर्ज; केवळ आठच अर्ज मंजुरीसाठी रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:30 IST2021-09-02T04:30:46+5:302021-09-02T04:30:46+5:30

नाशिक : ऑगस्ट महिन्यापासून महसूल विभागात मोठ्या प्रमाणात बदली आणि पदोन्नतीचे सत्र सुरू असून विनंती बदलीसाठी जिल्हा प्रशासनाकडे तब्बल ...

150 applications for requested transfers; Only eight applications were sent for approval | विनंती बदल्यांसाठी १५० अर्ज; केवळ आठच अर्ज मंजुरीसाठी रवाना

विनंती बदल्यांसाठी १५० अर्ज; केवळ आठच अर्ज मंजुरीसाठी रवाना

नाशिक : ऑगस्ट महिन्यापासून महसूल विभागात मोठ्या प्रमाणात बदली आणि पदोन्नतीचे सत्र सुरू असून विनंती बदलीसाठी जिल्हा प्रशासनाकडे तब्बल १५० पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे अर्जांची संख्या मोठी असली तरी सबळ कारणे असलेल्या केवळ आठच अर्जांचा विचार करण्यात आल्यामुळे इतर कर्मचाऱ्यांमध्ये काहीशी नाराजी देखील पसरली आहे.

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या बदल्या आणि पदोन्नतीची कार्यवाही महसूल विभागात सुरू झाली आहे. गेल्या ६ तारखेला मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर मध्यंतरी प्रशासकीय बदल्यांचेदेखील आदेश काढण्यात आले. ३० ऑगस्ट रोजी २२ तलाठी आणि २३ अव्वल कारकून यांच्यादेखील समुपदेशाने बदल्या करण्यात आलेल्या आहेत. पंधरा दिवसांपूर्वी सव्वाशेपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे. मागीलवर्षी ज्या बदल्या वादग्रस्त ठरल्या होत्या अशा बदल्यांच्याबाबतीत मॅट न्यायालयाच्या निर्णयानुसार देखील कार्यवाही करण्यात आलेली आहे. त्यामुळे मागील संपूर्ण महिना हा बदली आणि पदोन्नती प्रक्रियेतच पार पडल्याचे दिसते. सर्व प्रशासकीय जबाबदारी सांभाळून बदली संदर्भातील कार्यवाही करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, महसूल विभागात विनंती बदल्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे तब्बल १५० अर्ज प्राप्त झाले असून मंडळाधिकारी, अव्वल कारकुनांनी बदलीसाठी विनंती केली आहे. अर्जांची संख्या मोठी असली तरी जिल्हाधिकारी मांढरे यांनी बदलीसाठी सबळ कारण असलेले केवळ ८ विनंती अर्ज मान्य करून विभागीय महसूल आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवले असल्याचे समजते. आलेले अर्ज ३१ ऑगस्टपर्यंत विभागीय आयुक्तांना सादर करण्याची मुदत आहे. त्यामुळे अर्जांची छाननी करून केवळ अत्यंत सबळ कारण असलेल्यांची विनंती मान्य करण्यात आले आहेत. त्यानुसार केवळ ८ अर्जच प्रशासनाने मंगळवारी (दि.३१) विभागीय आयुक्तांकडे सादर केले आहेत. या बदल्यांबाबत विभागीय आयुक्त निर्णय घेणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी सांगितले.

Web Title: 150 applications for requested transfers; Only eight applications were sent for approval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.