नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येणारी तलाठी भरती परीक्षेची तयारी पूर्ण झाली असून, या परीक्षेच्या पेपर फुटीच्या चर्चेत काहीच तथ्य नाही. पेपरफुटीबाबत कोणी पुराव्यानिशी माहिती दिल्यास त्यास दहा लाख रुपये बक्षीस दिले जाईल, असे जाहीर आव्हान जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी दिले आहे. जिल्हा प्रशासनाच्या लिपिक व तलाठी भरतीबाबत उलट-सुलट चर्चा होऊन काही उमेदवार हमखास निवड होण्याबद्दल छातीठोक दावा करीत आहेत; त्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी खुलासा केला आहे. तलाठी भरतीसाठी दहा हजारांहून अधिक उमेदवार परीक्षेसाठी बसले आहेत. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका शनिवारी दुपारी तयार करण्यात येऊन पोलीस बंदोबस्तात त्या छपाईसाठी देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर या साऱ्या प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रण करण्यात येणार असल्याने प्रश्नपत्रिका फुटीचा प्रश्नच निर्माण होत नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. भरतीची ही प्रक्रिया पूर्णपणे गोपनीय व खबरदारी घेऊन पार पाडली जात असून, त्याबाबतच्या अफवांवर कोणी विश्वास ठेवू नये, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)