रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मजुरांना काम देण्याबाबत प्रशासनाने तत्परता दाखवून आघाडी घेतली असली तरी मनरेगाच्या कामावर काम करणारे मजूर मात्र सद्याच्या महामारीच्या काळात असुरक्षीतच असल्याचे चित्र आहे. मजुरांच्या कामाच्या ठिकाणी ना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ना प्रथमोपचार पेटी, ना पाळणार घर ना सॅनिटायझर. सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीही काळजी घेतली जात नसल्याने तो एक धोक्याचा संकेत आहे.नंदुरबार जिल्ह्यातील रोजगारासाठी स्थलांतरीत झालेले जवळपास ४० हजारापेक्षा अधीक मजूर जिल्ह्यात परतले आहेत. सद्याच्या स्थितीत सर्वच कामे बंद असल्याने मजूरही रिकाम्या हाती बसले आहेत. अशा स्थितीत प्रशासनाने मनरेगा वरील कामांना प्राधान्य दिले असून ४१८ गावात कामे सुरू केली आहेत. त्यावर जवळपास ३० हजार मजुरांना काम दिले आहे. या मजुरांना पहिल्या टप्प्यातील ३ कोटी ९३ लाख रुपये वेतन देण्यातही आले आहे. या कामांची स्थिती पहाता सद्या तरी राज्यात पाचव्या क्रमांकावर जिल्हा आहे.हे काम जरी समाधानकारक असले तरी प्रत्यक्षात मात्र कामाच्या ठिकाणी मजुरांची कुठलीही सुरक्षा व्यवस्था व काळजी घेतली जात नसल्याचे दिसून येते. या बाबत नंदुरबार, शहादा व धडगाव तालुक्यातील काही कामांवर फेरफटका मारला असता त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, लहान मुलांसाठी पाळणाघर आवश्यक आहे परंतु रखरखत्या उन्हातही तशी व्यवस्था नाही. काम करतांना मजुरांना दुखापत झाल्यास प्रथमोपचार पेटी आवश्यक असते. पण त्याचीही व्यवस्था नाही. आजच्या स्थितीत कोरोना रोखण्यासाठी प्रशासन सर्वांनाच सॅनिटायझर वापरण्याचा सल्ला देते पण रोहयोवरील कामांवरील मजुरांना मात्र ती सुविधा नाही.याही पेक्षा गंभीर बाब म्हणजे परराज्यातून मजूर परतत आहेत तसे त्या मजुरांची प्राथमिक तपासणी करून १४ दिवस घरातच क्वॉरंटाईन केले जात आहे. मात्र रोहयोच्या कामांवर असे शिक्के असलेले मजूरही दिसून आले.एकुणच नंदुरबार जिल्हा कोरोनामुक्त होत आहे. रुग्णालयातील उपचार घेणारे सर्व रुग्ण बरे झाल्याने ती एक दिलासादाय बाब आहे. अशा स्थितीत पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू नये याची काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषत: मनरेगाच्या कामांवरील मजुरांकडे अधीक लक्ष घालण्याची आवश्यकता असल्याने प्रशासनाने त्याकडे गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे.सद्याची परिस्थिती पहाता मजुरांना सॅनिटायझर अथवा हात धुण्यासाठी साबणाची व्यवस्था आवश्यक आहे. शिवाय पाणी, प्रथमोपचार पेटी व पाळणाघरांच्या सुविधांबाबत सुचना यापूर्वीच केल्या आहेत. यासंदर्भात पुन्हा सर्वांना नव्याने सुचना करून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश देत आहोत. तसेच क्वॉरंटाईन केलेले मजूर कामावर येणार नाहीत याची काळजी घेण्याची सुचना सरपंच व पोलीस पाटलांना देण्यात येणार आहे.-अनिकेत पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मनरेगा, जि.प., नंदुरबार.
महामारीतही रोहयोवरील मजूर असुरक्षीतच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 12:24 IST