मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोंढावळ गावात सर्दी, खोकला, ताप, यासारखी लक्षणे जवळजवळ बऱ्याच कुटुंबातील व्यक्तींमध्ये दिसत होती. म्हणून ग्रामपंचायत प्रशासनाने आरोग्य विभागाशी संपर्क साधून गावातच आरोग्य विभागाच्या टीमला पाचारण करून, ज्या लोकांना ताप, खोकला, सर्दी या सारखी लक्षणे दिसत होती. अशा १३६ लोकांनी स्वॅब दिले होते. पैकी ४९ लोकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यावर गावातील प्रशासन हादरून गेले होते. तेव्हा तत्काळ स्थानिक प्रशासनाने पॉझिटिव्ह लोकांना शहादा व नंदुरबार येथे सरकारी रुग्णालयात भरती करून, ज्या कुटुंबातील व्यक्ती बाधित आढळून आले होते, त्या कुटुंबांना गावातच विलगीकरण करण्यात आले होते. नंतर प्रशासनानेही कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जेथे-जेथे रुग्ण आढळून आले होते, ते क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले होते. तेथे बॅरिकेट्स आणि दांड्या लावून त्या क्षेत्रामध्ये पूर्णतः संचारबंदी लागू केली होती, तसेच संपूर्ण गावांमध्ये तीन आठवड्यांमध्ये पाच ते सहा वेळेस निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली होती.
सरपंच आशाबाई लक्ष्मण भिल, उपसरपंच अनिता दिगंबर माळी, ग्रामसेवक डी.आर. वळवी, पोलीस पाटील सुरेशगिरी गोसावी, लक्ष्मण भिल, दिगंबर माळी, ग्रामपंचायत सदस्य यासारख्या पदाधिकाऱ्यांनी गावात आवश्यक सेवा वगळता, सर्व दुकाने व छोटे उद्योग धंदे पूर्णत: बंद केले आहेत. वेळोवेळी गावामध्ये प्रशासनातर्फे दवंडी देऊन लोकांना बाहेर न निघण्याचे, तसेच नेहमी हात धुण्याचे व तोंडाला मास्क लावण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
लसीकरणासाठी आवाहन -
ज्या लोकांचे वय ४५ वर्षांपेक्षा अधिक आहे व लस घेतली नसेल, अशा व्यक्तींना लस घेण्यासाठी गावातील अंगणवाडीसेविका व मदतनीस यांच्यामार्फत लसीकरणासाठी घरोघरी जाऊन आवाहन करण्यात येत आहे, तसेच शहादा पंचायत समितीतील गट विकास अधिकारी आर.बी. घोरपडे व विस्तार अधिकारी बी.एस. सूर्यवंशी यांनी कोंढावळ येथे भेट दिली असता, तेथील विलगीकरण कक्षाची पाहणी करून लसीकरण मोहिमेसाठी गावातच कॅम्प लावण्याचे आश्वासन दिले.
गावातील स्थानिक प्रशासनाच्या मदतीमुळे व ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे आमचे गाव पूर्णतः कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत आहे. यापुढेही लोकांनी काम असेल, तरच बाहेर निघणे व वेळोवेळी हात धुणे व तोंडाला मास्क लावणे अशा नियमांचे पालन करून ग्रामस्थांनी लसीकरणासाठी साहाय्य करावे.
गटनेते-राकेश देवरे, कोंढावळ