आॅनलाईन कनेक्टीव्हीटीकरिता भर पावसात डोंगरावर भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 01:01 PM2020-09-05T13:01:05+5:302020-09-05T13:01:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : सध्या कोरोना महामारीमुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ चे प्रवेश अनेक महाविद्यालयात आॅनलाईन प्रणालीद्वारे होत आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वाण्याविहीर : सध्या कोरोना महामारीमुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ चे प्रवेश अनेक महाविद्यालयात आॅनलाईन प्रणालीद्वारे होत आहेत. सातपुड्यातील तसेच इतर ठिकाणच्या अतिदुर्गम भागातील अनेक विद्यार्थी आॅनलाईन प्रणालीद्वारे शाळा, महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी जेथे इंटरनेट कनेक्टीव्हिटी आहे तेथे जाऊन प्रवेश निश्चित करीत आहेत. परंतु प्रवेश घेतल्यानंतर चालू वर्षीचा अभ्यास करणे या विद्यार्थ्यांसाठी जिकरीचे होत आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील खडकापाणी येथील अनेक विद्यार्थ्यांना ज्यांच्याकडे मोबाईल उपलब्ध आहेत, अशा विद्यार्थ्यांना अश्या प्रकारे कुठेही बसून, अभ्यास करावा लागत आहेत. या भागात जवळ जवळ कुठेही टॉवर नसल्यामुळे डोंगरावर चढल्या शिवाय उपाय नसतो. सातपुड्यातील अनेक गावात ही समस्या असल्याने याकडे प्रशासन व सरकारने लक्ष देणे आवश्यक आहेत.
राज्यातील ८० टक्के शाळा, महाविद्यालयांनी प्रवेशीत विद्यार्थ्यांना आॅनलाईन प्रणालीद्वारे शिकवण्यासही सुरूवात केली आहे. शिवाय खाजगी क्लासेस चालकांनीदेखील आॅनलाईन शिकवण्या सुरू केल्या आहेत. त्यात आताच न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या जातीलच या निर्णयामुळे या आदिवासी मुलांचे काय हाल होतील.
आदिवासी पाड्यांवरील अनेक विद्यार्थ्यांना मोबाईल इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि मोबाईल उपलब्ध नसल्यामुळे ही पद्धत कुचकामी ठरत आहे. म्हणून याचा फटका अशा विद्यार्थ्यांना बसत आहेत. तरी शिक्षणाची ओढ असलेले विद्यार्थी जेथे इंटरनेट कनेक्टिव्हिटी भेटेल तिथे व फक्त ज्यादिवशी इंटरनेट कनेक्टिव्हिटी असते त्यादिवशी आॅनलाईन तासिकाही बुडतात. तसेच आता पावसामुळे या अडचणीत अधिकच भर पडत असते. तरी दगडगोट्यांवर बसूनही आॅनलाईन प्रणालीचा वापर करून अभ्यास करावा लागत आहेत. सरकारने २१ आॅगस्ट २०२० रोजी केंद्राकडे शैक्षणिक वर्ष बदलण्याचा प्रस्ताव पाठवला असून, राज्यात काहीही झाले तरी १०० टक्के विद्यार्थ्यांपर्यंत आॅनलाईन, आॅफलाईन जसे शक्य होईल तसे शिक्षण मिळालेच पाहिजे अशी, अट घातली असली तरी अतिदुर्गम भागातील इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि मोबाईलची अनुपलब्धता यामुळे ही पद्धत कुचकामी ठरणार आहे. म्हणून आॅनलाईन पद्धतीने शिक्षण देणे शक्य होईल. परंतु त्यासाठी सरकारने इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि गरजू विद्यार्थ्यांना मोबाईल उपलब्ध करून देणे आवश्यक ठरेल.
घरापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर आणि १०० मीटर अंतराचा डोंगर चढून डोंगराच्या शेवटच्या टोकावर चार-पाच दगड आहे. त्या दगडावर उभे राहून लेक्चर पहावे लागते.
-सुक्रम काल्या वसावे, द्वितीय वर्ष एम.कॉम, सावित्रीबाई फुले विद्यापीठ
सध्या पावसाचे वातावरण असल्यामुळे आम्हाला इथे डोंगरावर येऊन सुध्दा नेटवर्कचा स्पीड जेमतेम १०० ते २०० केबी भेटत असल्यामुळे लेक्चर अटेंड करण आणि लेक्चर डाऊनलोड करण्यासाठी मोठी कसरत करावी लागतेय. त्यात तीन ते चार जण एकत्र बसल्यावर तेवढा पण स्पीड भेटत नाहीत.
-दिलीप चमाऱ्या पाडवी, बीलिब.एलएससी,
हं.प्रा.ठा. कला व रा.या.क्ष. विज्ञान महाविद्यालय, नाशिक.