वाहनांच्या थांब्यामुळे वाहतुकीची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 12:08 PM2019-12-11T12:08:51+5:302019-12-11T12:08:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहराची वाहतुकीची समस्या सुटत नसल्याने नागरिक आणि वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागतो. नगरपालिका ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहराची वाहतुकीची समस्या सुटत नसल्याने नागरिक आणि वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागतो. नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाकडून या समस्येवर ठोस कारवाई होत नसल्याने ही समस्या पुन्हा ‘जैसे थे’ झाली आहे. खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या थांब्यामुळे या समस्येत भर पडली आहे.
शहरातील बसस्थानक परिसर, डोंगरगाव रोड, भाजी मार्केट परिसर, स्टेट बँक चौक, नगरपालिका कार्यालय, खेतिया रोड चौफुली ते तूपबाजार चौक, आचार्य तुलसी मार्ग अशा सर्व गजबजलेल्या रस्त्यांवर वाहतुकीच्या समस्येने घेरले आहे. यामुळे शहादेकर नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील विविध भागात क्षमतेपेक्षा जास्त अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने पोलिसांचा कुठलाही धाक न बाळगता बिनधास्तपणे शहरात उभे असतात. वाहतूक शाखेच्या पोलिसांसमोर ही वाहने रस्त्यातच उभी असतात. शहरातील मेनरोडवरून दुचाकी चालविणे जिकरीचे आहे. खेतिया चौफुली ते तूपबाजार चौकापर्यंतच्या मेनरोड दोन्ही बाजूंनी व्यावसायिकांच्या ओट्यांचे अतिक्रमण आणि हातगाड्यांनी रस्त्यावर ठाण मांडल्याने पादचाऱ्यांना जीव मुठीत धरुनच चालावे लागते.
शहादा बसस्थानक परिसराची अवस्था याहून वाईट आहे. बसस्थानकाचे दोन्ही प्रवेशद्वार अतिक्रमणाच्या विळख्यात असल्याने व अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने रस्त्यातच उभी राहत असल्याने चालकांना बस चालविण्याची कसरत करावी लागते. या परिसरात दुकानांसमोर उभी राहणारी ग्राहकांची बेशिस्त वाहने आणि हातगाड्यांनी वाहतुकीची कोंडी होते. येथील अतिक्रमण काढून पालिकेने पार्कींग झोन व पादचारी रस्ता तयार केला होता. मात्र लक्ष न घातल्याने अतिक्रमण पुन्हा ‘जैसे थे’ झाल्याने वाहतुकीच्या समस्येने पुन्हा डोके वर काढले आहे.
डोंगरगाव रस्त्यावरील वाहतूकही जीवघेणी ठरत आहे. रस्त्याच्या दुतर्फा उभी राहणारी खाजगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने, आॅटोरिक्षा यामुळे डोंगरगाव रस्त्याच्या वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या रस्त्यावर प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांवर कोणाचाही धाक नसल्यासारखी परिस्थिती आहे. शहरात वाहतुकीची समस्या निर्माण झाल्याने शहरातून बोरद परिसरात जाणाºया सर्व बसेस डोंगरगाव रस्तामार्गे वळविण्यात आल्याने या रस्त्यावरील रहदारी वाढली आहे. दवाखाने, शाळा, महाविद्यालय यामुळे वाहतूक जास्त असल्याने हा रस्ता मोकळा होणे आवश्यक आहे. शहरातील भाजी मंडईकडे जाणाºया दोन्ही रस्त्यांवरही अतिक्रमण व हातगाड्यांमुळे वाहतुकीची कोंडी होते. भाजी मार्केटमध्ये येणाºया महिलांना याचा मोठा त्रास होतो. डायमंड बेकरीजवळील मार्गावरही खाजगी वाहनांनी रस्ता अडविल्याने दिवसभर वाहतुकीची कोंडी होते. हा रस्ता एकेरी असून याठिकाणी पोलिसांतर्फे असलेल्या तीन चाकी वाहनांना प्रवेश बंद असा सूचना फलक केवळ नावालाच उरला आहे.
शहरातील वाहतुकीची ही समस्या सोडविण्यासाठी नगरपालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करणे आवश्यक आहे. तसेच गांधी पुतळा परिसर, आचार्य तुलसी मार्ग, स्टेट बँक चौक, डोंगरगाव रोड याठिकाणी कायमस्वरूपी कर्तव्यदक्ष वाहतूक पोलिसांची नेमणूक झाल्यास काही प्रमाणात वाहतुकीची समस्या सुटू शकते.