तोरणमाळ हे पर्यटनस्थळ घोषित केले. मात्र आता जंगलात अवैध वृक्षतोडीचे प्रमाण वाढले असून सागाच्या झाडांसह इतर दुर्मीळ झाडांची मोठ्या प्रमाणात तोड करण्यात येत आहे. तोरणमाळ परिसरात भूमाफियांनी अतिक्रमण करून जंगल गिळंकृत करण्यास सुरुवात केली आहे. याचा फटका सातपुड्यातील पशू-पक्षी व प्राण्यांना आणि त्यांच्या अधिवासाला बसत आहे. सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यात पूर्वी मोठ्या संख्येने वन्यप्राणी व पक्षी अधिवास करत होते. मात्र आता याकडे प्रशासन आणि वनविभागाचे दुर्लक्ष झाल्याने जंगलपट्टा नष्ट होऊन वन्यप्राण्यांचे जीव धोक्यात आले आहेत. एकीकडे वाढते नागरिकरण व त्यातून उद्भवणारे अतिक्रमण यामुळे वनविभागाला आवश्यक असणारे वाढीव मनुष्यबळ न मिळाल्याने हा अनर्थ घडतो आहे, असे सांगितले जाते. विविध झाडे, पशू व पक्ष्यांनी समृद्ध असलेल्या या परिसरात मुरुड शेख, हरडा, सागवान, सावर, पळस, शिसव, बांबू, चिंच, खैर, अर्जुन, जांभूळ, बकुळी, राजन, काकड, महू अशा विविध प्रकारच्या वनस्पती तसेच बिबट्या, तरस, रानडुक्कर, रानमांजर भेकर, कोल्हा, ससे, घोरपड असे विविध वन्यप्राणी तर पोपट, मोर, बगळा, घुबड, हळद्या, कोकीळ, पावशा, सर्पगरुड, महागराज, शामा जंगली पिंगळा, सुभग, पर्ण पक्षी असे अधिक प्रजातीचे पक्षी आहेत. मात्र बेसुमार वृक्षतोड आणि वाढते अतिक्रमण यामुळे वनसंपदा आणि प्राणी-पक्ष्यांचा अधिवास नष्ट होत असल्याची चिंता पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.
गाववस्तीकडे वन्यप्राण्यांची धाव
सातपुड्यात होणारी बेसुमार वृक्षतोड, वाढते अतिक्रमण यामुळे वन्यप्राण्यांचा अधिवास धोक्यात येत आहे. त्यामुळे वन्यप्राणी गाववस्तीकडे धाव घेत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसून येत आहे. यामुळे गाववस्तीत वन्यप्राण्यांकडून हल्ले होऊन पाळीव प्राणी ठार होण्याचे प्रमाणही वाढत आहे. परिणामी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.