नंदुरबार : लग्न समारंभाच्या ठिकाणी ५० पेक्षा अधिक व्यक्ती आढळून आल्याने नंदुरबारातील पथकाने तीन आयोजकांवर कारवाई करीत थेट गुन्हे दाखल केले आहेत.
बबन तुमडू अहिरे रा.संत रोहिदास शिरोमणी रोहिदास चौक, बाहेरपुरा नंदुरबार यांनी बाहेरपुरा या ठिकाणी, जयेश सुदाम कुवर, रा. रनाळे, ता.नंदुरबार यांनी छत्रपती शिवाजी नाट्य मंदिर या ठिकाणी, शिरीष ताराचंद वारुळे, रा. विरसावकर नगर यांनी वीर सावरकर नगर येथे राहत्या घरी अशा ठिकाणी होणारे लग्न समारंभासाठी बॅंड पथकासह ५० व्यक्ती हजर राहणार आहे. याबाबत पोलीस प्रशासनाकडून परवानगी घेतली होती. परंतु वरील तिन्ही ठिकाणी असलेल्या लग्न समारंभाचे आयोजकांनी २०० ते २५० लोकांची गर्दी जमवून तोंडाला मास्क अथवा रुमाल न वापरता लग्न समारंभात एकत्र जमले होते. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे व त्यांनी पोलीस प्रशासनाकडून घेतलेल्या परवानगीचे उल्लघंन केले. त्यामुळे नायब तहसीलदार भीमराव बोरसे यांनी नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नायब तहसीलदार भिमराव बोरसे तसेच शहर पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, चालक जगन कोकणी, गोपनीय शाखेचे अंमलदार शैलेंद्र माळी, श्रीकांत पाटील यांनी ही कारवाई केली.