लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील नगाव तिसी येथील जिल्हा परिषद शाळेतून १८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता़ गुन्ह्याप्रकरणी एलसीबीच्या पथकाने तिघांना अटक केली आहेनगाव तिसी येथील जिल्हा परिषदेची शाळा बंद असल्याने चोरट्यांनी डिजीटल साहित्यासह तांदूळ चोरी करुन नेला होता़ मुख्याध्यापिका प्रमिलाबाई साहेबराव देसाई यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ दरम्यान चोरीच्या घटनेची माहिती घेत एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी तपास सुरु केला होता़ पॅरोलवर सुटलेल्या गुन्हेगारांवर नजर ठेवत त्यांनी तपास सुरु केला होता़ यात भालेर येथील रविंद्र कथ्थू, कृष्णा चव्हाण व विठ्ठल कोळी यांनी चोरी केल्याची खात्रीशीर माहिती त्यांना मिळाली होती़ यातून त्यांनी नियुक्त केलेल्या पथकाने भालेर येथे जावून संशयितांचा शोध सुरु केला होता़ यादरम्यान रविंद्र कथ्थू पवार हा पथकाच्या हाती आला होता़ त्याची चौकशी केली असता, आधी उडवाउडवीची उत्तरे दिली होती़ परंतू पथकाने पोलीस खाक्या दाखवताच त्याने कृष्णा रतीलाल चव्हाण (कोळी) व विठ्ठल रतिलाल कोळी यांची नावे सांगितली होती़ पथकाने दोघांना तिसी येथून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना ताब्यात घेतले़ त्यांच्याकडून शाळेतून चोरलेला प्रोजेक्टर, सीपीयू आदी १४ हजार २१६ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे़ ही कारवाई पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत , अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र पाडवी, सजन वाघ, पोलीस नाईक विशाल नागरे, दादाभाऊ मासूळ, बापू बागुल, जितेंद्र अहिरराव, यशोदीप ओगले यांच्या पथकाने केले़
नगाव येथील चोरीप्रकरणी तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 12:27 IST