याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहादा तालुक्यातील पूर्वेकडील अतिदुर्गम व डोंगरी आदिवासी भागातील गोटाळी, लंगडी, मंदाणे, दामळदा, कुरंगी, कोचरामार्गे खेतिया या मध्य प्रदेश राज्याला जोडणाऱ्या तब्बल २५ किलोमीटर रस्त्याचे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत काम करण्यात आले. या मार्गावरील कुरुंगी येथे उमरी व दामळदा येथील गोमाई नदीवर पूल बांधण्यात आले. त्याशिवाय अनेक ठिकाणी लहान-मोठ्या मोऱ्याही करण्यात आल्या. मात्र सद्य:स्थितीत या रस्त्याची भीषण दुरवस्था झालेली आहे. असलोद, लंगडी, शहाणा, चांदसैली, भोंगरा, वडगाव, भोरटेक, ओझर्टा, जाम, लोहारा, गोगापूर आदी गावातील नागरिकांची दैनंदिन कामे खेतियाला असतात. या रस्त्यात खड्डेच खड्डे पडल्याने वाहनचालकांना वाहन चालविताना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते. या रस्त्यावर दररोज अपघात होत आहेत. वास्तविक ठेकेदाराने पाच वर्षांपर्यंत देखभाल व दुरुस्ती करून घेण्याची हमी घेतलेली असताना आतापर्यंत या रस्त्याची कितीवेळा दुरुस्ती झाली याचीही चौकशी करण्याची गरज आहे. बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधींनी या रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष द्यावे, अशी मागणी वाहनचालक, शेतकरी व कामगार यांच्याकडून केली जात आहे.
गोटाळी-मंदाणे ते खेतिया रस्त्यावर काटेरी झुडपे व खड्डेच खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:21 IST