जिल्ह्यात टेक्स्टाईल व फूड इंडस्ट्रीजला वाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 11:36 AM2020-06-07T11:36:09+5:302020-06-07T11:36:18+5:30
संडे स्पेशल मुलाखत नंदुरबार व नवापूर येथील औद्योगिक वसाहतीच्या विकासाच्या कामाला गती देण्याचे काम सुरू आहे. - महेंद्र पटेल, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी
रमाकांत पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार जिल्ह्यात कृषीमालावर आधारीत उद्योगांना चांगली संधी असून त्यासाठी तरुण उद्योजकांनी पुढे आले पाहिजे असे मत महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यासन विभाग तीनचे प्रादेशिक अधिकारी महेंद्र दशरथ पटेल यांनी व्यक्त केले. महेंद्र पटेल हे मुळचे नंदुरबार जिल्ह्यातील समशेरपूर, ता.नंदुरबार येथील रहिवासी असून नुकतीच त्यांना मुंबई येथे प्रादेशिक अधिकारी पदावर बढती मिळाली आहे. उत्तर महाराष्टÑातील पाच जिल्ह्यांसह मराठवाड्यातील औरंगाबाद, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीं त्यांच्या अधिकार क्षेत्रात येतात.
नंदुरबार जिल्ह्यातील औद्योगिक वसाहती आज कुठल्या स्थितीत आहेत?
नंदुरबार जिल्ह्यात सध्या नवापूर आणि नंदुरबार या दोनच ठिकाणी औद्योगिक विकास महामंडळाचे काम सुरू आहे. त्यापैकी नवापूर येथील ६४ हेक्टर क्षेत्रातील औद्योगिक वसाहत विकसीत करण्यात आली असून तेथे भुखंडाचे वाटप होऊन काही उद्योगही सुरू झाले आहेत. या ठिकाणी औद्योगिक विकासाला मोठा वाव असल्याने तेथील औद्योगिक वसाहतीचे विस्तारीकरणासाठी पुन्हा १९१ हेक्टर जमीन संपादनाचा प्रस्ताव आहे. तर नंदुरबार येथील भालेर शिवारात २८५ हेक्टर क्षेत्रात एमआयडीसी विकासाचे काम सुरू आहे. तेथे रस्ते व इतर कामे झाले असून भुखंड वितरणालाही सुरुवात झाली आहे. लवकरच या कामाला गती येणार आहे.
जिल्ह्यात इतर तालुक्यांच्या एमआयडीसी प्रस्तावांचे काय?
जिल्ह्यात शहादा, तळोदा, अक्कलकुवा या ठिकाणी औद्योगिक वसाहत स्थापन्यासंदर्भातील प्रस्ताव तयार होणे अपेक्षीत आहे. त्यासाठी जर स्थानिकांनी पुढाकार घेतल्यास निश्चित तेथेही एमआयडीसी होऊ शकते. शहाद्यात सिंचीत जमीन आहे. औद्योगिक वसाहतीसाठी मुरबाड व खडकाळ जमीन आवश्यक असते.
नंदुरबार जिल्ह्यात औद्योगिक विकासासाठी शासनाच्या मोठ्या सवलती आहेत. त्यामुळे तरुण उद्योजकांनी उद्योग स्थापण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. या जिल्ह्यात दळणवळण, पाणी व इतर सुविधा देखील असल्याने उद्योग विकासाला पोषक वातावरण आहे.
नंदुरबार जिल्ह्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. त्यामुळे या जिल्ह्यात टेक्स्टाईल पार्कला वाव आहे. त्यामुळे नंदुरबारच्या औद्योगिक वसाहतीतील १०० एकर जमीन त्यासाठी राखीव आहे. नवापूर येथे देखील अनेक टेक्स्टाईल उद्योग सुरू झाले आहेत. गुजरातच्या सिमेवर असल्याने नवापूरलाही औद्योगिक विकासासाठी चांगली संधी आहे. ते लक्षात घेवूनच तेथील एमआयडीसी विस्ताराचे काम हाती घेण्यात आले आहे. जिल्ह्यात मिरची, सोयाबीन, कडधान्याचे पीकं मोठ्या प्रमाणावर घेतली जात असल्याने फूड इंडस्ट्रिजचा हब होऊ शकतो.