विसरवाडी : नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील भारत दूरसंचार निगमचे वीज बिल न भरल्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. गेल्या चार दिवसांपासून येथील बीएसएनएलची मोबाईल सेवा ठप्प झाली असून, येथील असंख्य ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
ग्रामपंचायतीने उभारलेल्या ग्रामसचिवालयात भारत संचार निगमचे दूरध्वनी कार्यालय आहे. परिसरात भारत दूरसंचारचे ग्राहक मोठ्या प्रमाणावर आहेत. येथील दूरध्वनी कार्यालयाचे वीज बिल थकीत असल्याने वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित केला आहे.
त्यामुळे दूरध्वनी सेवा व भ्रमणध्वनी सेवा चार दिवसांपासून कोलमडली असल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे. या सेवेसंदर्भात ग्राहक वारंवार तक्रार देण्यासाठी जात असून ग्राहकांना समाधानकारक उत्तरे दिली जात नाहीत. येथील बीएसएनएलची भ्रमणध्वनी सेवा नेहमीच वारंवार ठप्प झालेली असते. त्यामुळे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन येथील दूरध्वनी व भ्रमणध्वनी सेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.