शहादा येथील टॅक्सी चालक तळोदा येथे प्रवासी घेऊन आल्यानंतर, टॅक्सी स्टँडवर न येता, प्रवासी उतरवून शहरातील विविध चौकांत नंदुरबारकडे जाणारे प्रवासी शोधतात. यातून तळाेदा येथील मूळ गाडीमालकांना नंदुरबारचे प्रवासी मिळत नाहीत. शहादा येथील चालक तळोद्यातून नंदुरबारचे प्रवासी पळवत असल्याने सातत्याने वाद सुरू झाले आहेत. याबाबत तळोदा टॅक्सी युनियनने शहादा युनियनसोबत पत्रव्यवहारही केला आहे, परंतु यानंतरही हा प्रकार थांबलेला नाही. तळोेदा येथील चालकांना प्रवासीच मिळत नसल्याने ते शहादा किंवा नवापूर जाताना परतीचेही भाडे मागणी करत असल्याचे प्रकार यातून होत आहे.
यातून नंदुरबार ते तळोदा या प्रवासासाठी एका प्रवाशाला साधारण १५० रुपये द्यावे लागत आहे. वास्तवित तळोदा ते नंदुरबार या मार्गाचे प्रवास भाडे हे माफक ४० रुपये आहे, परंतु लाॅकडाऊन काळात हा दर ७५ रुपये एवढा करण्यात आला होता, परंतु आता थेट दुप्पट भाडे झाल्याने अडचणी वाढल्या आहेत.
दरम्यान, तळोदा येथील टॅक्सी चालक-मालकांना नंदुरबार येथील चालक-मालक गाड्या भरू देत नसल्याची माहिती देण्यात आली आहे. यातून तळोदा येथील टॅक्सी चालकांची वाहने रिकामीच रहात असल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट आल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकारातून मात्र प्रवाशांचे हाल होत असल्याने संबधित विभागाने तातडीने कारवाई करण्याची मागणी आहे.
याबाबत तळोदा टॅक्सी युनियनचे सदस्य अजय सोनवणे यांची सांगितले की, शहादा येथील टॅक्सी चालकांनी तळोदा येथील टॅक्सी केबिनमध्येपूर्वीप्रमाणे वाहन उभी करावीत. त्यांच्याकडून सुरू असलेल्या मनमानी वाहतुकीमुळे तळोद्यातील टॅक्सीचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.