नंदुरबार : आयान साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या खात्यात उसाच्या पेमेंटचे १५ कोटी रुपये जमा केले आहेत, अशी माहिती कारखान्याचे संचालक सचिन सिनगारे यांनी दिली.
समशेरपूर येथील आयान साखर कारखान्याने गेल्या महिन्यात ऊस गाळपास प्रारंभ केला. अत्याधुनिक यंत्राचा वापर करून उसाचे गाळप करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी कारखान्यात दिलेला ऊस संगणकीकृत काट्यावर मोजला जातो. कारखान्याने वीजनिर्मिती प्रकल्प सुरू केला आहे. त्यामुळेही शेतकऱ्यांना लाभ होतो. या सर्व बाबींचा विचार करून कारखान्याने या वर्षी उसाला प्रती टन दोन हजार ४२५ रुपये दर दिला. हा दर गेल्या दहा वर्षातील उच्चांकी ठरला आहे. ३१ जानेवारी २०२१ पर्यंत कारखान्याकडे ज्या शेतकऱ्यांनी ऊस दिला आहे, अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात त्यांच्या उसाचे सर्व पेमेंट जमा करण्यात आले आहे. ही रक्कम १५ कोटी रुपये असल्याची माहिती सिनगारे यांनी दिली.
शेतकरी दराबाबतदेखील समाधानी आहेत. गाळप करावयाचा सर्व ऊस गाळप केला जाईल, असेही सिनगारे यांनी सांगितले. नोंदणीकृत बिगर नोंदीचा सर्व ऊस गाळप होईल, असे ते म्हणाले.