नंदुरबार : जिल्ह्यातील केलखाडी (ता. अक्कलकुवा) येथील नदीवर पूल नसल्याने परिसरातील डोंगरपाड्यावरील विद्यार्थ्यांना दररोज झाडाच्या फांदीवरून दोरीच्या सहाय्याने तोल सांभाळून जीव धोक्यात घालत पलिकडच्या जिल्हा परिषद शाळेत जावे लागते. स्वातंत्र्यपूर्व काळापासून येथे रस्ता नाही. दोन वर्षांपासून ग्रामस्थ येथील रस्ता आणि पुलासाठी पाठपुरावा करीत आहेत. मात्र प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सांगा आमच्या समस्या तुम्हाला कोणत्या 'भाषेत' कळणार? असा सवाल या चिमुकल्यांची जीवघेणी कसरत बघून उपस्थित होत आहे.
४०० -लोकवस्तीची जीवघेणी कसरत
२० -विद्यार्थ्यांचा जीव रोज धोक्यात
२० -फूट खोल आहे केलखाडी नदी
२४ -फूट लांब झाडाचा रस्ता
पुलासाठी दोन वर्षांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा
आमच्या पाड्यापर्यंत जाण्यासाठी धड रस्ता नाही. पलीकडे केलीपाडा येथे जाण्यासाठी नदीवर पूल नाही. त्यामुळे जीवघेणी कसरत रोजचीच झाली. रस्ता आणि पुलासाठी दोन वर्षांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत. मात्र, अजून दाद मिळालेली नाही. शंकर पाडवी, ग्रामस्थ
आधी डोंगर मग नदी...
विद्यार्थी तसेच ग्रामस्थांना केलखाडी गावात येण्यासाठी आधी डोंगर उतरून नदीकाठावर यावे लागते. त्यानंतर या फांदीवरून नदी पार करावी लागते.