मदरशामध्ये अडकले देशभरातील सहा हजार विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 12:30 PM2020-04-07T12:30:38+5:302020-04-07T12:30:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : येथील जामिया इस्लामिया इशातुल उलूम अर्थात मदरशातील धार्मिक शिक्षण घेणारे महाराष्ट्रासह इतर राज्यातील सहा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकुवा : येथील जामिया इस्लामिया इशातुल उलूम अर्थात मदरशातील धार्मिक शिक्षण घेणारे महाराष्ट्रासह इतर राज्यातील सहा हजार २०० विद्यार्थी लॉकडाऊनमुळे येथील मदरशात अडकून पडले आहेत. लॉकडाऊन कधी संपते याकडे संस्थेचे लक्ष लागले असून या मुलांना आपापल्या घरी कसे पोहोचवता येईल यासाठी तालुका व जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून आहे.
शहरातील जामिया इस्लामिया इशातुल उलूम अर्थात मदरशामध्ये धार्मिक शिक्षण घेणाऱ्या मुलांसह शैक्षणिक संकुलातील सुमारे १२ हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या संकुलातील विविध शैक्षणिक शाखांमध्ये पदवी तसेच पदवीकांचे शिक्षण घेणारी मुले संस्थेच्या वसतिगृहांमध्ये राहून शिक्षण घेतात. मदरशाच्या मुख्य इमारतीत मौलाना, कारी, हापिज अशा विविध धर्मगुरूंच्या पदव्या मिळवण्यासाठी सुमारे १० हजारापेक्षा जास्त मुले संपूर्ण देशभरातील विविध राज्यांतून याठिकाणी धार्मिक शिक्षण घेत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊन केल्यामुळे या मदरशातील धार्मिक शिक्षण घेणारी सुमारे सहा हजार २०० मुले अडकून पडले आहेत. या विद्यार्थ्यांची मदरशातील मुख्य इमारतीमध्ये सद्यस्थितीत व्यवस्था केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपूर्ण देशात जनता कर्फ्यूच्या आवाहनानंतर लगेच जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी जिल्ह्यातील संपूर्ण शासकीय व खाजगी शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सुट्या देऊन आपापल्या घरी पाठवण्याचे आदेश दिले होते. या वेळी या मदरशातील शैक्षणिक संकुलातील सर्व शाळा, महाविद्यालय, पदवी, पदविकाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आपापल्या घरी पाठविण्यात आले होते. मात्र मदरशातील धार्मिक शिक्षण घेणाºया या मुलांना त्याचवेळी का पाठवण्यात आले नाही? असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे. या विद्यार्थ्यांना त्याचवेळी आपापल्या घरी पाठवून दिले असते तर आज या विद्यार्थ्यांना मदरशात अडकून पडण्याची वेळ आली नसती याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे, अशीही मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
दरम्यान, पंतप्रधानांनी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. त्यापूर्वी या मदरशातील हजारो विद्यार्थी आपापल्या घरी पोहोचले. याठिकाणी अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांनाही पोहोचविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र त्याच रात्री गृहसचिवांचे सक्त आदेश आल्यामुळे पोलीस प्रशासनाने या बसेसची परवानगी नाकारल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.
या मदरशामधील संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक जण सतत अरब देशांच्या तसेच इतर देशांच्या दौºयावर असतात. मात्र कोरोनानंतर येथील एकही जण परदेशातून न आल्याचे मदरशा प्रशासनाने केलेल्या दाव्यामुळे जिल्हा प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास घेतला आहे. मात्र काहीजण अरब देशातून प्रवास करून आल्याची शासकीय गुप्तहेर यंत्रणांना माहिती मिळाली होती त्यात सत्यता नव्हती का असाही सवाल उपस्थित केला जात आहे.
या मदरशात सालाबादाप्रमाणे होणारा जलसा अर्थात धर्मगुरू पदवीदान समारंभ एप्रिल महिन्याच्या अखेरीस होत असतो, त्या पार्श्वभुमीवर विद्यार्थ्यांना आपापल्या घरी पाठवण्यात आले नाही ना? याबाबतही चर्चा सुरू आहे.
४मदरशात अडकून पडलेले विद्यार्थी कोणकोणत्या राज्यातील किती आहेत यासंदर्भात मदरसा प्रशासन, तालुका प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्याशी संपर्क करूनही त्याबाबत आकडेवारी मिळू शकली नाही.