शिवसेनेचा सस्पेन्समुळे उत्सूकता शिगेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 12:04 PM2020-01-17T12:04:43+5:302020-01-17T12:04:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन्यासाठीची गोपनियता तिन्ही पक्षांनी कायम ठेवली आहे. काँग्रेसचे सदस्य राज्याबाहेर तर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन्यासाठीची गोपनियता तिन्ही पक्षांनी कायम ठेवली आहे. काँग्रेसचे सदस्य राज्याबाहेर तर भाजपचे सदस्य जिल्ह्यालगत एका शहरात एकत्र आहेत. शिवसेनेचे सदस्य सहलीवरून परतले आहेत. काँग्रेस-शिवसेना एकत्र येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दुसरीकडे भाजपनेही आमच्याकडे बहुमत असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील सत्तेबाबत प्रचंड उत्सूकता लागून आहे.
जिल्हा परिषदेत कुठल्याही एका पक्षाला बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे शिवसेनेच्या पाठींब्यावर सर्व काही अवलंबून राहणार आहे. ही बाब लक्षात घेता प्रत्येकी २३ सदस्य असलेल्या भाजप व काँग्रेसने सावध खेळी खेळल्या आहेत. भाजपने राष्टÑवादीच्या तीन सदस्यांसोबत गट स्थापन केला आहे. गटनेते म्हणून कुमुदिनी गावीत यांची निवड झाली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे सद्य स्थितीत २६ सदस्य आहेत. दुसरीकडे काँग्रेसकडे २३ सदस्य आहेत. शिवसेनेने पाठींबा दिला तर त्यांची संख्या ३० होणार आहे. बहुमतासाठी २९ सदस्य आवश्यक आहेत.
गेल्या आठ दिवसांपासून वेगवान राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत. काँग्रेसने आपले सदस्य राज्याबाहेरील एका शहरात तर भाजपने आपले सदस्य जिल्ह्यालगतच्या एका शहरात सहलीसाठी नेले आहेत. शिवसेनेचेही सदस्य बाहेरगावी गेले होते मात्र ते परत आले आहेत.
काँग्रेस व भाजपने बहुमत असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आपलीच सत्ता स्थापन होईल असा विश्वास दोन्ही पक्षाच्या नेत्यांना आहे.
परंतु ऐनवेळी काहीही घडामोडी घडू शकतात. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी सत्ता स्थापनेचा मुद्दा प्रतिष्ठेचा केला आहे. आगामी राजकारणाची दिशा देखील त्यावरच अवलंबून राहणार असल्यामुळे ऐनवेळी राजकीय घडामोडी वळण घेवू शकतात असेही बोलले जात आहे.
बुधवारी नवापूर येथे काँग्रेस व शिवसेनेच्या नेत्यांची बैठक झाल्याचा दावा एका नेत्याने केला आहे. त्यात सत्ता स्थापनेचा फार्म्यूला ठरला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे काँग्रेस-शिवसेना एकत्र येणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. याला एका नेत्याने देखील दुजोरा दिला आहे. त्यामुळे राज्यातील आणि नंदुरबार पालिकेतील सत्तेचा फार्म्यूला जिल्हा परिषदेतही कायम राहणार का? याकडे लक्ष लागून आहे.