सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे तालुक्यातील अक्कलकुवा व खापर गट तसेच कोराई गणात निवडून आलेल्या ओबीसी उमेदवारांची उमेदवारी रद्दबातल ठरल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार अक्कलकुवा गट सर्वसाधारण स्त्री राखीव खापर गट सर्वसाधारण तसेच कोराई गण सर्वसाधारण स्त्री राखीव झाला आहे. तालुक्यातील हे दोन गट आणि एक गण या तिन्ही जागा आपल्याकडे खेचून आणण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून, प्रबळ उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. तालुक्यातील अक्कलकुवा व खापर या दोन्ही गटांवर भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व होते. या निवडणुकीत हे दोन्ही गट पुन्हा आपल्याकडे यावेत यासाठी व्यूहरचना आखली जात असून, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनीही या गटांवर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी प्रबळ उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांची राज्यात महाआघाडीचे सरकार असताना तालुक्यातील होऊ घातलेल्या या पोटनिवडणुका प्रत्येक पक्ष स्वबळावर लढण्याची तयारी करीत असल्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र सध्या दोन गट आणि गणात आहे.
अक्कलकुवा व खापर गट तसेच कोरोई गणासाठी उमेदवारांची चाचपणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:20 IST