नंदुरबार : शहरालगतच्या सत्यमनगर वसाहतीत पथदिवे बसविण्यात येत नसल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. या परिसरात काही ठिकाणी पथदिवे बसविले आहेत. मात्र, मुख्य रस्त्यांवर व वसाहतीतील काही भागांत पथदिवे बसविले नसल्याने अंधाराचे साम्राज्य असते. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतीने याकडे लक्ष देऊन त्वरित पथदिवे बसवावेत, अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे.
रस्त्यावरील वाळू ठरतेय अपघातास कारणीभूत
नंदुरबार : तळोदा रोडवरून साक्री रस्त्याकडे जाणाऱ्या वाळूच्या वाहनातून पडणारे पाणी आणि वाळू नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. रस्त्यावर वाळू पडून राहत असल्याने, अनेक वाहनधारक घसरून गंभीर इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना करण्याची मागणी वाहनधारक व नागरिकांकडून करण्यात येत आहे.
महिलांमध्ये भीतीचे वातावरण
नंदुरबार : शहरातील विविध मार्गांवर मनोरुग्ण विचित्र अवस्थेत फिरताना दिसून येतात. रात्री अचानक ते समोर येत असल्याने, नागरिकांमध्ये विशेषत: लहान बालके व स्त्रियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे या मनोरुग्णांवर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांतर्फे करण्यात येत आहे, तरी संबंधितांनी याकडे लक्ष देऊन उपाययोजना करण्याची गरज आहे.