लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : देशातील कोरोना संकटाचा सामना सर्व मिळून एकत्रितपणे करू आणि या संकटावर मात करू, असा विश्वास पालकमंत्री अॅड.के.सी.पाडवी यांनी व्यक्त केला. नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता करून देण्याबाबत निर्देश दिले असल्याचेही ते म्हणाले.पालकमंत्री अॅड.पाडवी यांनी सांगितले, विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने संचारबंदी लागू करण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तू मिळण्याबाबत नागरिकांच्या मनात शंका आहे. मात्र देशातील जीवनावश्यक वस्तू व सेवाबाबतच्या कायद्यानुसार आवश्यक वस्तू व सेवा नागरिकांना उपलब्ध होतील. नागरिकांनी घरातच राहावे, इतरांच्या संपर्कात येऊ नये. नागरिकांना आवश्यक सुविधा मिळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कार्यरत आहे. आपण स्वत: प्रशासनाच्या संपर्कात आहोत. गावपातळीवर भाजीपाला व अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे नियोजनदेखील झाले आहे. अन्नधान्याचा साठादेखील पुरेशा प्रमाणात आहे. औषधेदेखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
जीवनावश्यक वस्तुंचे योग्य नियोजन-पालकमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 12:38 IST