बैठकीला नायब तहसीलदार जितेंद्र पाडवी, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, विसरवाडी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, गटविकास अधिकारी सी.के. माळी, पालिका प्रशासकीय अधिकारी अनिल सोनार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत वसावे, आगार प्रमुख राजेंद्र अहिरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते व कर्मचारी उपस्थित होते.
या वेळी तहसीलदार मंदार कुलकर्णी म्हणाले की, ग्रामीण भागात वीजपुरवठ्याबाबत काळजी घेणे, रस्त्यावर झाडे पडल्यास तत्काळ अडथळा दूर करणे, नुकसान पंचनामे तत्काळ सुरू करावे, नवापूर तालुक्यातील ग्रामस्थांच्या समस्या सोडविणे, ग्रामीण भागात तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवक, महावितरण, पशुवैद्यकीय, आरोग्य विभागाचे डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहणे आवश्यक आहे. लोकांचे स्थलांतर करणे, जुन्या पडक्या घरातील लोक तलाठी आणि ग्रामसेवक यांनी हलविणे, शुद्ध पिण्याच्या पाण्याबाबत काळजी घेणे, साथ रोगांबाबत काळजी घेणे, ग्रामस्थांना आवश्यक सूचनेबाबत दवंडी देणे, सर्व विभाग यांनी एक कर्मचारी पावसाळा संपेपर्यंत आपत्ती कक्ष म्हणून रात्री कार्यालयात ठेवणे आवश्यक आहे. पावसाळ्यात नदीकिनारी भागातील नागरिकांची काळजी घेणे आदी सूचना यावेळी देण्यात आल्या.
नवापूर शहर व तालुक्यातील नदी-नाले ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविणेकामी उपाययोजना करणे आवश्यक आहे. तसेच शहरातील नाले सफाई तत्काळ करण्यात यावी. सर्व शासकीय अधिकारी यांनी या कालावधीत आपला मोबाइल सुरू ठेवावा. याकामी अतिआवश्यक साधनसामग्री यांची जुळवाजुळव करून घ्यावी, असेही तहसीलदारांनी सांगितले. या बैठकीला पाटबंधारे विभाग व महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी सूचना देऊनही गैरहजर होते.