यात सकीस्मा पोल्ट्रीतील १ लाख ७ हजार ७८९ तर जनता पोल्ट्रीमधील २२ हजार ९६५ पक्षी नष्ट करण्यात आले आहेत. २४ पैकी २२ पोल्ट्री फार्ममधील पोल्ट्रीतील सर्व पक्षी नष्ट करण्यात आले. सहा दिवसात आतापर्यंत ५ लाख १० हजार २१० पक्षी नष्ट करण्यात आले आहेत. तर १८ लाख ७७ हजार ८४५ अंडी नष्ट केली, अशी माहिती तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली.
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा वगळून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात बर्ड फ्लूची लागण झाल्याचे दिसून येत आहे. देशात महाराष्ट्र राज्य आघाडीवर असून त्यातील नवापूर हे बर्ड फ्लूचे मुख्य केंद्र बनले आहे. आर्थिक उलाढाल काहीअंशी मंदावली आहे. नवापुरात राज्यातील सर्वात मोठे किलिंग ऑपरेशन सुरू आहे. यासाठी मोठी यंत्रणा कमाल लागली आहे. पाच ते दहा जेसीबी मशीन, १५ ते २० ट्रॅक्टर, टेम्पो, ॲम्बुलन्स, तसेच कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी चार ते पाच स्कूल बस तसेच ४० ते ५० शासकीय वाहने, नगरपालिकेचे आरोग्य विभागाची वाहतूक यंत्रणा या मोहिमेत सहभागी झालेले आहेत. महसूल पशुसंवर्धन, पोलीस, नगरपालिका पंचायत समिती, आरोग्य विभाग, कृषी विभाग, शिक्षण विभाग, सर्वच विभागातील अधिकारी कर्मचारी बर्ड फ्लू नियंत्रणासाठी कार्यरत आहेत. सर्व पोल्ट्रीतील पक्ष्यांचा नाश झाल्यानंतर निर्जंतुकीकरण करण्यात येईल, अशी माहिती पशुसंवर्धन प्रादेशिक सहआयुक्त बाबूराव नरवाडे यांनी दिली.
शनिवारी अनेक मोठ्या पोल्ट्रीतील कोल्ड स्टोरेजमध्ये साठवलेली लाखो अंडी नाश करण्यात येणार आहेत. तसेच बर्ड फ्लू ग्रस्त पोल्ट्रीतील लाखो पक्षी नष्ट करण्याचे किलिंग ऑपरेशन शेवटच्या टप्प्यात राबविण्यात येणार आहे. आठवड्याभरातील किलिंग ऑपरेशनमध्ये जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, प्रांताधिकारी वसुमना पंत व नवापूरचे तहसीलदार मंदार कुलकर्णी यांच्या उत्तम नियोजनामुळे बर्ड फ्लू नियंत्रणाचे काम सुरळीत सुरू आहे. शिश पोल्ट्रीचे मालक यांच्या पोल्ट्रीच्या झालेल्या नुकसानीची माहिती देताना शिश टिमोल भावूक झाले.
तीन महिने पोल्ट्री व्यवसाय बंद राहणार
साधारणतः ९० दिवसांपर्यंत नवापुरातील संपूर्ण पोल्ट्री व्यवसाय बंद राहणार आहे. त्यादरम्यान एका पोल्ट्रीतील साधारणतः २५ ते ३० असे एकूण हजारो मजुरांचा पोटापाण्याचा प्रश्न उभा राहणार आहे. नवापूर शहरात बर्ड फ्लूच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी शहरातील चिकन व अंडी विक्रीवर बंदी घातल्याने शेकडो छोटे-मोठे व्यावसायिकांवर बेराजगारीचे संकट उभे टाकले आहे. आधीच कोरोनाने हैराण झालेल्या छोट्या व्यापारांना बर्ड फ्लूचे या नवीन आलेल्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे.