नंदुरबार : अनलॉक अंतर्गत सर्व व्यवहार सुरू झालेले असताना देवाचे दर्शन मात्र बंदच आहे. त्यामुळे आता भक्तांना ‘उघड दार देवा आता’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. पर्यटन क्षेत्र खुले करताना धार्मिक क्षेत्र मात्र बंद ठेवण्याच्या अजब प्रकारामुळे भक्तांमध्ये नाराजीचे वातावरण देखील आहे.
अनलॉक अंतर्गत जिल्ह्यात विविध बाबींची सूट देण्यात आली आहे. व्यवहार सर्वसामान्य झाले आहेत. ही बाब लक्षात घेता मंदिरे देखील सुरू होण्याची अपेक्षा होती, परंतु ती फोल ठरली. मंदिरे उघडण्याबाबत अद्याप काहीही निर्णय झालेला नाही. त्यामुळे प्रतिकाशी असलेल्या प्रकाशा तीर्थक्षेत्री देखील सामसूम राहत आहे. आलेले भाविक कळस दर्शन घेऊन जात आहेत. नंदुरबारातील गणपती मंदिर तसेच दंडपाणेश्वर मंदिरावर देखील भाविकांना बाहेरून दर्शन घ्यावे लागत आहे. अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्तही कायम आहे.
मंदिरे बंद असल्यामुळे फूल विक्रेते, पूजा साहित्य विक्रेते यांच्या व्यवसायावर देखील परिणाम झाला आहे. त्यामुळे त्यांचेही अर्थकारण बिघडले आहे. शासन मंदिरे खुली करण्याबाबत कधी निर्णय घेते याकडे आता भक्तांचे लक्ष लागून आहे.