नंदुरबार : जिल्ह्यात रासायनिक खतांचा समाधानकारक पुरवठा करण्यात आला असून, शेतकऱ्यांनी खतांचा अनावश्यक साठा करू नये, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. जिल्ह्याला खरीप २०२१ हंगामाकरिता एकूण ९६ हजार २० मेट्रिक टन रासायनिक खतांचे आवंटन करण्यात आलेले आहे. १० मेपर्यंत त्यापैकी ८७८० मेट्रिक टन रासायनिक खतांचा पुरवठा करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी खताच्या एकाच ग्रेडचा आग्रह न धरता, उपलब्ध असलेल्या खतांमधून आपली गरज भागवावी आणि आवश्यक तेवढेच खत खरेदी करावे. खतांचा तुटवडा जाणवू नये, यासाठी अनावश्यक साठा करू नये. खरीप हंगामात मंजूर आवंटनानुसार टप्प्याटप्प्याने पुरेसे खत उपलब्ध होईल. पिकांना फक्त युरिया खताची आवश्यकता नसून, इतरही घटक पीक व उत्पादन वाढीसाठी आवश्यक असल्याने युरियासोबत कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या रासायनिक खतांचा प्रमाणात वापर करावा. खत खरेदी करताना आधारकार्ड सोबत न्यावे.
जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ४५ हजार ५९० मेट्रिक टन युरियाचे आवंटन असून, चार हजार ६१ मेट्रिक टन प्राप्त झाले आहे. एमओपी ९ हजार ८६०पैकी ५१८ मेट्रिक टन, एसएसपी १७ हजार ३००पैकी २ हजार ९८४ मेट्रिक टन, एनपीके १६ हजार ३९० मेट्रिक टन आवंटन असून, त्यापैकी १ हजार २१२ मेट्रिक टन पुरवठा झाला आहे. डीएपीचे ६ हजार ८८० मेट्रिक टन आवंटन असून, अद्याप पुरवठा झालेला नाही, अशी माहिती कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद, नंदुरबार यांनी दिली आहे.