नंदुरबार : काँग्रेस नेते, खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ग्राऊंड लेव्हलचा कार्यकर्ता थेट राष्ट्रीय पातळीवर आपल्या नेतृत्त्वाची चमक दाखवतो, ही बाब महाराष्ट्रातील तरुणांसाठी एक आदर्श निर्माण करणारी होती, अशी भावना जिल्ह्यातील नेत्यांनी व्यक्त केली.
अभ्यासू नेते...
खासदार राजीव सातव यांच्या आकस्मिक निधनामुळे मन दु:खी झाले. ते माझ्यासाठी लहान भावासारखे होते. काँग्रेस पक्षाचे एक अतिशय तरुण, सक्रिय, अभ्यासू नेते होते. युवकांचे प्रेरणास्थान होते. त्यांनी पक्षात आणि आयुष्यात सामाजिक न्यायाच्या तत्त्वांचे समर्थन केले. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे. आम्ही एक महान नेता गमावला आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय नेते अहमद पटेल यांच्या निधनामुळे पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली होती. आता खासदार सातव यांच्यासारखे उमदे नेतृत्व आपल्यातून गेले.
-ॲड. के. सी. पाडवी,
आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री.
सर्वसामान्यांचा नेता
एक ग्राऊंड लेव्हलचा नेता महाराष्ट्राने गमावला. तळागाळातील कार्यकर्त्यांची जाण असलेला नेता म्हणून खासदार राजीव सातव यांच्याकडे पाहिले जात होते. दिल्लीला गेलेला व हायकमांडशी जवळीक असलेल्या नेत्याचा स्वभाव बदलतो. परंतु खासदार सातव नेहमीच सर्वसामान्य नेते राहिले. त्यांच्या आई रजनी सातव व आपण एकाच वेळी विधान परिषदेत आमदार होतो. दिल्लीला कधीही गेलो तर ते हक्काने भेटत असत.
-चंद्रकांत रघुवंशी,
काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व विद्यमान शिवसेना नेते.
पक्षात मोठी पोकळी
खासदार राजीव सातव यांचे निधन झाल्याने काँग्रेस पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. काँग्रेस पक्ष वाढवण्यात त्यांचे मोलाचे सहकार्य होते. अगदी प्रेमाने आणि आपुलकीने बोलायचे, मार्गदर्शन करायचे. ज्येष्ठ नेते सुरूपसिंग नाईक साहेबांचीदेखील विचारपूस करायचे, असे अनन्यसाधारण व्यक्तिमत्त्व हरपल्याने काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे, ते कधीही भरून न निघणारे आहे.
-शिरीषकुमार नाईक, आमदार, नवापूर.
उच्च प्रतिभेचा नेता
खासदार राजीव सातव यांच्या निधनाची बातमी दु:खदायक आहे. मी आमदार व मंत्री असताना त्यांचे व माझे मित्रत्त्वाचे संबंध होते. सामाजिक व राजकीय क्षेत्रांतील ते एक उच्च प्रतिभा असणारे नेते होते. त्यांच्या निधनामुळे पक्षाचे न भरून येणारे नुकसान झाले. राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसला मोठ्या नेत्याला मुकावे लागले आहे. महाराष्ट्र नाही तर देशाचे मोठे नुकसान झाले आहे.
-ॲड. पद्माकर वळवी,
माजी मंत्री.