नंदुरबार : कोरोनाचा संसर्ग वाढू नये, सुरू असलेल्या लाॅकडाऊनमधून अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे. यात खाजगी प्रवासी बस वाहतुकीचा समावेश असून नंदुरबार शहरातून पुण्या-मुंबईकडे जाणाऱ्या सहा बसेस धावू लागल्या आहेत. यातून प्रवास करणारे प्रवासी संसर्गाच्या भीतीने स्वत:च सुरक्षा उपायांवर भर देत असल्याचे दिसून आले आहे.
मार्च महिन्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या, वाढता मृत्यूदर यामुळे एक एप्रिलपासून जिल्ह्यात लाॅकडाऊन सुरु झाले होते. यात वेळोवेळी वाढ होत राहिली आहे. यातून जिल्हाबंदी लागू झाल्याने प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. यात केवळ अत्यावश्यक म्हणून प्रवास करु इच्छिणाऱ्यांना परवानगी देण्यात आली होती. त्यासाठी विविध कोविड नियमावली लागू करण्यात आली होती. दरम्यान लाॅकडाऊनमुळे बाहेर गावी अडकलेले परतीसाठी प्रयत्नशील हाेते. यातून खाजगी प्रवासी बसेसला कोविड नियमांसह वाहतूक करण्यास परवानगी मिळाल्याने अनेकांना आधार मिळाला आहे.
नंदुरबार शहरातून सायंकाळी सुटणाऱ्या सहा बसेसची पडताळणी केली असता, मास्क आणि सॅनेटायझर वापरात प्रवासीच अग्रभागी असल्याचे दिसून आले. प्रवाशांची इच्छितस्थळी पोहोचल्यावर तेथील प्रशासन तपासणी करत असल्याचे सांगण्यात आले. बहुतांश प्रवासी हे वैद्यकीय कारणांमुळे मुंबई व पुण्याकडे जात असल्याने त्यांची कागदपत्रे तपासणी केली जात होते. येणाऱ्या प्रवाशांचीही तपासणी होत असल्याचे ट्रॅव्हल्सचालकांनी सांगितले.
मास्क व सॅनिटायझर
शहरातून दररोज सायंकाळी बाहेर पडणाऱ्या बसेससाठी नोंदणी करताना कोविड रिपोर्ट सक्तीचा असल्याचे सांगण्यात आले. त्याशिवाय तिकीट दिले जात नसल्याचे सांगण्यात आले. दररोज सर्व सहा बसेस सॅनिटाईज करुन देण्यात येत असल्याचे तसेच चालक व वाहकांची वेळोवेळी कोरोना रॅपिड टेस्ट करण्यात येत असल्याची माहिती चालकांकडून देण्यात आली. मास्क व सॅनिटायझरची सक्ती आहे.
एकही कारवाई नाही
दरम्यान शहरातील ट्रॅव्हल्स सुरु झाल्या असल्या तरी त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या वाहतुकीचा आढावाही उपप्रादेशिक परिवाहन विभागाने घेतला नसल्याचे समोर आले आहे. यातून नेमकी वाहतूक योग्य की अयोग्य पद्धतीने सुरु आहे किंवा कसे याची पडताळणीही झालेली नसल्याचे समोर आले आहे. याकडे संबधित विभागाने लक्ष देत ट्रॅव्हल्स चालकांना सूचना करण्याची मात्र गरज आहे.
ई-पास राज्याकडून
जिल्हा बंदीदरम्यान ई-पास देण्याचा अधिकार हा शासनाने स्वत:कडे ठेवून घेतला आहे. यातून ट्रॅव्हल्समधून प्रवास करणारे ई-पाससाठी अर्ज केल्यानंतर तिकीट बुक करत आहेत. काही ट्रॅव्हल्सचालक या पासची काॅपी मिळाल्याशिवाय तिकिट देत नसल्याचे सांगण्यात आले. ज्या शहरात जायचे तेथे तपासणी होत असल्याने हे सक्तीचे असल्याचे चालकांनी सांगितले.