बाजारात गर्दी आणि रेटारेटी कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 12:41 PM2020-03-27T12:41:02+5:302020-03-27T12:41:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : संचारबंदी व लॉक डाऊनचा कुठलाही परिणाम शहरी भागात दिसून येत नसल्याची स्थिती आहे. बाजारात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : संचारबंदी व लॉक डाऊनचा कुठलाही परिणाम शहरी भागात दिसून येत नसल्याची स्थिती आहे. बाजारात खरेदी करण्यासाठी दररोज सकाळी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. गुरुवारी तर नंदुरबार व शहाद्यात खरेदीसाठी प्रचंड गर्दी झाली होती. मंगळ बाजारात तर रेटारेटी देखील होत होती. त्यामुळे कोरोना बाबत कुणीही गांभिर्याने घेत नसल्याची स्थिती आहे.
आता प्रशासनाने विविध वस्तू विक्रीच्या दुकांनांना परवाणगी दिल्याने शुक्रवारपासून गर्दी आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे लॉकडाऊन आणि संचारबंदीचा उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याची स्थिती आहे.
जिल्ह्यात सर्वत्र संचारबंदीची स्थिती असतांना तसेच नागरिकांना एकाच ठिकाणी गर्दी न करण्यासंदर्भात सुचना असतांना देखील त्याचे पालन कुणीही करीत नसल्याची स्थिती आहे. बाजारात तर अक्षरश: रेटारेटी सुरू आहे. केवळ किराणा दुकानांवर मार्र्कींगची सुविधा सुरू करण्यात आली आहे. पोलीस व जिल्हा प्रशासनाने देखील शिथीलता आणल्याने नागरिक कुणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याची स्थिती आहे.
बाजारात रेटारेटी
गुरुवारी सकाळी बाजारात भाजीपाला, फळ व इतर वस्तू खरेदीसाठी अक्षरश: रेटारेटी झाली. सकाळी नऊ वाजेपासून १२ वाजेपर्यंत ही स्थिती कायम होती. नागरिकांना कोरोनाचे ना भय ना चिंता अशी स्थिती होती. बाजारात अनेक ठिकाणी अगदी एकमेकांना लागून भाजीपाला विक्रीच्या लॉरी लागल्या होत्या. त्यामुळे विशिष्ट अंतर ठेवून खरेदी करण्याच्या सुचनांचे कुणीही पालन करीत नसल्याची स्थिती आहे.
किराणा दुकानांवर सतर्कता
किराणा दुकानांवर मात्र सतर्कता बाळण्यात येत असल्याचे चित्र आहे. अनेक लहान, मोठ्या किराणा दुकानदारांनी आपल्या दुकानांसमोर मार्कीग सिस्टिम करून त्याच अनुषंगाने ग्राहकांना किराणा वितरीत केले जात असल्याचे चित्र आहे. अशची पद्धत शिवसेनेतर्फे सुरू करण्यात आलेल्या भाजीपाला विक्री केंद्राच्या ठिकाणी देखील दिसून आली. भाजीपाला विक्रीच्या दुकानांवर देखील अशी पद्धत अवलंबविणे आवश्यक असतांना तसे कुठेही दिसून येत नाही.
पोलिसांकडून शिथीलता
संचारबंदीच्या पहिल्या दिवशी पोलिसांकडून कडक धोरण अवलंबविण्यात आले होते. याबाबत तक्रारी झाल्यानंतर व नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केल्या गेल्यानंतर त्यात थोडी शिथीलता आणली गेली.
अनेक ठिकाणी तर पोलीस कर्मचारीच दिसून येत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे नागरिक कुणीही आणि कुठेही सहजपणे फिरतांना दिसून येत आहेत. त्यामुळेच ठिकठिकाणी गर्दी होत असल्याचे चित्र आहे.
किराणा, भाजीपाला व पिठाची गिरणी : कुठलेही निर्बंध नाहीत.
बेकरी, रेस्टॉरंट व हॉटेल्स : सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत.
अंडी, चिकन, मटन व मासे विक्री : सकाळी ८ ते १२ व दुपारी ३ ते ६
(केवळ मंगळ, बुध, शुक्र व रविवार)
पशु उपचार व औषधी दुकाने : सकाळी ९ ते दुपारी २
कृषी खते व खाद्य दुकाने : सकाळी ९ ते दुपारी ३
दूध विक्री केंद्र : सकाळी ७ ते ९, सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत.
स्वस्त धान्य दुकाने : नियमित वेळेत सुरू राहतील.
इंटरनेट सुविधा पुरविणारे, पुरवठा साखळी गोडावून, गोदाम, वेअर हाऊस यांना निर्बंध नाहीत.
जीवनावश्यक वस्तूचा तुटवडा राहणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. नागरिकांनी आवश्यक तेवढीच खरेदी करावी. विनाकारण गर्दी करून प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करू नये. जीवनावश्यक वस्तू पुरेशा प्रमाणात आहेत. त्यामुळे नागरिकांनी संयम राखावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी केले आहे.