केंद्र सरकारची धोरणे ही येथील सर्वसामान्य तसेच मध्यम वर्गाला देशोधडीला लावणारी असून, त्या विरुद्ध आता आंदोलन अधिक तीव्र करावे लागेल. दिल्लीत देशभरातले किसान गेल्या १०० दिवसांपासून थंडी पाऊस आणि आता उन्हाची पर्वा न करता रस्त्यावर ठिय्या देऊन बसले आहेत. त्यांच्या संघर्षाची दखल घेत सरकारने आता ताबडतोब हे तिन्ही कायदे मागे घ्यावेत, अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र होईल, असा इशारा देण्यासाठी व केंद्र सरकारच्या निषेध करण्यासाठी शनिवारी अक्कलकुवा व तळोदा तालुक्यातील गावांमध्ये आदिवासी शेतकऱ्यांनी आपल्या घरांवर काळे झेंडे लावून आंदोलन केले.
या वेळी कुंभारखान, खटवणी, रोजकुंड, कुंडी, ठाणा, गोरजाबारी, खाई, गुलीअंबा, ओहवा, वालंबा, भराडीपादर, अंबाबारी या अक्कलकुव्यातील गावांमध्ये व तळोदा तालुक्यातील राणमहू, कालिबेल, कोयलिडाबर, माळखुर्द, गाढवली, या गावांमध्ये हे आंदोलन करण्यात आले.