नंदुरबार : गेल्या वर्षी मार्च महिन्यात शिरकाव झालेल्या कोरोनामुळे सातत्याने लावल्या जाणाऱ्या लाॅकडाऊनमुळे जिल्ह्यात व्यापार आणि व्यापारी यांचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले होते. यातून सावरत गाडी पुन्हा रुळावर येत असताना, १५ दिवसांचा लाॅकडाऊन सुरू होत असल्याने व्यापाराला मोठा फटका बसणार आहे. यामुळे लाॅकडाऊन नकोच, असा पवित्रा व्यापारी घेत आहेत.
कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी जिल्ह्यात ३१ मार्च मध्यरात्रीपासून ते १५ एप्रिल मध्यरात्रीपर्यंत पूर्णत: संचारबंदीचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत आहेत. या आदेशांच्या पार्श्वभूमीवर व्यापारी व किरकोळ दुकानदारांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. १५ दिवस केवळ भाजीपाला विक्रेते व इतर अत्यावश्यक सेवाच सुरू राहणार असल्याने, छोट्या-मोठ्या उद्योगांवर चालणाऱ्या व्यवसायांचे काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. नंदुरबार शहरात एकूण साडेआठ हजार छोटी व मोठी व्यवसाय प्रतिष्ठाने आहेत. या व्यवसायांवर अनेकांचा रोजगार चालतो. हा रोजगार थेट १५ दिवस बंद राहणार असल्याने पुढे काय, असा प्रश्न आहे. दरम्यान, रोटेशन पद्धतीने असे व्यवसाय सुरू ठेवण्याचा सल्लाही व्यापारी देत आहेत. दरम्यान, लाॅकडाऊनचा थेट फटका शहरातील किरकोळ खाद्यपदार्थ विक्रेते, फेरीवाले, बांधकाम कारागीर, विविध इलेक्ट्राॅनिक व इलेक्ट्रिकल वस्तू दुरुस्ती करणारे कारागीर, प्लंबर, मजूर, सराफ बाजारात माळ पोळणारे कारागीर आदी १० हजारांच्या जवळपास रोजंदारीने रोजगार कमावणाऱ्यांना बसणार आहे. सोबतच रिक्षाचालक आणि इतर मालवाहतूक वाहनांचे वाहतूकदार यांनाही आर्थिक नुकसान होणार आहे.
शाळा व महाविद्यालये बंद, लाॅकडाऊनमध्ये दुचाकी व चारचाकीवर फिरणे बंद
जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक व कोचिंग संस्था, वसतिगृहे, प्रशिक्षण संस्था २७ मार्चपासून पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. ऑनलाइन किंवा दूरस्थ शिक्षणास अनुमती असणार आहे. दुसरीकडे विनाकारण मोटारसायकल व चारचाकी वाहनाने शहरी भागात फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. वैद्यकीय कारणांसाठी दवाखान्यात जाणाऱ्यांना मात्र सूट देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. शहरी भागात १ मार्चपासून पोलीस बंदोबस्त तैनात होणार आहे.
या सेवा राहतील बंद
सर्व बाजारपेठा, आठवडी बाजार, अत्यावश्यक नसलेली सर्व दुकाने, शॉपिंग मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स, बार्बर शॉप, स्पा, सलून, ब्युटी पार्लर,
करमणूक उद्याने, सिनेमागृहे, नाट्यगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, प्रेक्षकगृहे, क्रीडा संकुले , मंगल कार्यालये, खुले लॉन्स, सभागृह, असेम्ब्ली हॉल.
सर्व हॉटेल/ रेस्टॉरंट, लॉजिंग, परमिट रूम बीयर बार.
सामाजिक, राजकीय, धार्मिक, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शने व इतर सर्व गर्दी होणारे कार्यक्रम.
धार्मिक व प्रार्थनास्थळे सर्व सामान्यांसाठी बंद राहतील, तथापि धर्मगुरू, पुजारी यांना अनुमती आहे.
भाजीपाला बाजार सकाळी सहा ते ११ या वेळेत. भाजीपाला आणि किराणा वस्तूंच्या घरपोच सेवेला मंजुरी. दूध वितरकांना सकाळी ७ ते ९ आणि संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत परवानगी.
वृत्तपत्र कार्यालये आणि वितरण.
किराणा दुकाने सकाळी ६ ते ११ या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी.
सर्व प्रकारची माल वाहतूक व अत्यावश्यक सेवेसाठी गॅरेज.
गॅस वितरण.
पेट्रोलपंप केवळ अत्यावश्यक सेवा व शासकीय वाहनांसाठी. लोकसेवा आयोग व विद्यापीठाच्या परीक्षेसाठी संबंधित परीक्षा केंद्र, नियुक्त अधिकारी, कर्मचारी, यंत्रणा व परीक्षार्थींना पेट्रोल दिले जाईल. अंत्यविधीसाठी २० पेक्षा अधिक व्यक्तींना अनुमती असणार नाही.
सर्व शासकीय कार्यालये, बँका, पोलीस, होमगार्ड, जिल्हा सूचना केंद्र, महावितरण, सशस्त्र दले, अग्निशमन दल, शासकीय धान्य गोदाम, कारागृहे, म्युनिसिपल सेवा.
दूध विक्रेत्यांना त्या-त्या तहसीलदारांकडून ओळखपत्र घ्यावे लागणार आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे.
खासगी अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ओळखपत्र बाळणे बंधनकारक करण्यात आले आहे.