नवापूर तालुक्यातील नवापूर उपजिल्हा रुग्णालय, अल शिफा रुग्णालय, मिशन हॉस्पिटल या तीन रुग्णालयांत कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. येथे एकही व्हेंटिलेटर नसल्याने रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. १२० किलोमीटर अंतरावर असलेल्या सुरत व धुळ्याला जाण्याची वेळ येत आहे. परंतु या ठिकाणी रुग्णालय फुल्ल असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. यासंबंधी जिल्हा प्रशासनाने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
या कोरोना काळात डॉक्टर चांगल्या पद्धतीने काम करत असले तरी त्यांच्या पुढे अनेक समस्या येत असून, रुग्णांना बेड मिळत नाही. कोरोना रुग्णांना ऑक्सिजन बेडची संख्या कमी पडत आहे. ग्रामीण आणि शहरी भागातून येणाऱ्या कोरोना रुग्णांना वाचविण्यासाठी ऑक्सिजन बेड वाढविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
नवापूर उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटर व्यवस्था करण्यात आली होती. परंतु त्यासाठी लागणारे तज्ज्ञ नसल्याने व्हेंटिलेटरचा वापर कुचकामी ठरला आहे.
नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हाऊसफुल्लचा बोर्ड लागला आहे. अनेक रुग्णांना ताटकळत राहावे लागत आहे. परंतु उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे रुग्णांना बेड उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत असून, त्यांना खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो. शासकीय रुग्णालयात बेड आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे गरीब रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे शासकीय रुग्णालयात आयसीयू बेड व ऑक्सिजन सिलिंडर बेडची संख्या वाढवणे गरजेचे आहे.
नवापूर उपजिल्हा रुग्णालयात अपुऱ्या ऑक्सिजनअभावी शहरातील गणेश हिलमधील रहिवासी तळोदा न्यायालयातील वरिष्ठ अधिकारी किसन गावीत यांचा मृत्यू झाल्याचा आरोप श्रीकांत पाठक यांनी केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पाठविलेल्या संदेशात म्हटले आहे की, तब्येत गंभीर झाल्यावर त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले असता ड्युटीवरील नर्सने दाखल करून न घेता गुजरात राज्यातील व्यारा येथे घेऊन जाण्यासाठी सांगितले. त्यांना विनंती केली की, त्यांना श्वासोच्छ्वासासाठी त्रास होत आहे, कमीत कमी ऑक्सिजन सिलिंडर तरी द्या. त्यांनी सिलिंडर दिले, परंतु त्यात ऑक्सिजनच नव्हता. जेमतेम सोनगडपर्यंत त्या सिलिंडरमधील ऑक्सिजनचा पुरवठा होता. जर ऑक्सिजनचा पुरवठा झाला असता तर ती व्यक्ती जिवंत राहिली असती. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या दोषी कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पाठक यांनी केली आहे.
नवापूर तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी रात्री तत्काळ जिल्हा रुग्णालयात संपर्क करून ऑक्सिजन सिलिंडरची मागणी केली होती. त्यानंतर ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करण्यात आला. नवापूर उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडर होते, परंतु रुग्णसंख्या जास्त असल्याने त्याचा वापर झाल्याने सिलिंडर संपले. त्यानंतर रुग्ण आल्याने त्यांना शेवटचे अर्धे वापरलेले सिलिंडर देण्यात आले होते.
- डॉ. शशिकांत वसावे, तालुका वैद्यकीय अधिकारी, नवापूर