कोरोना मुक्तीचा ‘नंदुरबार पॅटर्न’ आदर्श करू या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 12:46 IST2020-04-15T12:46:08+5:302020-04-15T12:46:15+5:30

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : संपूर्ण जगाला हादरवणारा कोरोना या विषाणूजन्य आजाराने महाराष्टÑातही हादरा दिला असला ...

Let's model the 'Nandurbar pattern' of Corona liberation ... | कोरोना मुक्तीचा ‘नंदुरबार पॅटर्न’ आदर्श करू या...

कोरोना मुक्तीचा ‘नंदुरबार पॅटर्न’ आदर्श करू या...

रमाकांत पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : संपूर्ण जगाला हादरवणारा कोरोना या विषाणूजन्य आजाराने महाराष्टÑातही हादरा दिला असला तरी राज्यातील जे निवडक जिल्हे या आजारापासून लांब राहिले त्यात नंदुरबारचा समावेश आहे. अर्थातच जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचा विषाणू रोखण्यासाठी प्रशासनाची भूमिका ही जशी महत्त्वाची आहे तसा प्रशासनाच्या आवाहनाला लोकांनी दिलेला प्रतिसादही तेवढाच लाख मोलाचा आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा पहिला टप्पा जिल्ह्यात यशस्वी झाला असला तरी पुढील काळही कसोटीचा असून ती कसोटी पार करीत कोरोनामुक्त जिल्ह्याचा ‘नंदुरबार पॅटर्न’ सर्वत्र लौकीक व्हावा यासाठी पूर्वीपेक्षाही जास्त जबाबदारीने सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.
गेल्या तीन-साडेतीन दशकात सामूहिक संकटाच्या अनेक घटना घडल्या. या घटनांवर जनतेने सामूहिकपणे मात केली आहे. मग ती स्कायलॅबचे संकट असो की सुरतमधील प्लेगची साथ असो. प्रत्येकवेळी लोक या संकटांना धैर्याने सामोरे गेले व माणुसकी आणि शिस्तीची साथ मात्र सोडली नाही. आता कोरोनाच्या संकटाला सामोरे जाताना लोक अधिक धैर्याने त्याला सामोरे जात आहेत. विशेष म्हणजे या काळात शासनाने लोकांना ज्या खबरदारीच्या सूचना केल्या आहेत त्याचे काटेकोरपणे स्वयंस्फूर्तीने पालन करीत आहेत. भले जिल्ह्यातील साक्षरतेचे प्रमाण राज्यात कमी असले तरी शहरी भागापेक्षा मात्र जिल्ह्यातील लोक या काळात अधिक जागरुकतेने आणि जबाबदारीने वागत आहेत हे निश्चितच वाखाणण्याजोगे आहे.
या काळात प्रशासनदेखील अधिक जबाबदारीने व जोखीम पत्करुन काम करीत आहे. स्वत: जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, महसूल आणि पोलीस दलातील कर्मचारी यासह सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सारेच कोरोनाला रोखण्यासाठी आणि त्यामुळे उद्भवलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. विशेष बाब म्हणजे प्रशासनाच्या या कामावर प्रथमच लोकप्रतिनिधी आणि जनताही खूष असल्याचे दिसून येत आहे. साहजिकच ही एकजूट सर्वांनाच प्रेरणा देणारी व प्रोत्साहीत करणारी असल्याने या संकटाच्या काळातही सर्वांचे मनोबल टिकून आहे.
सध्याच्या स्थितीत जिल्हा कोरोनापासून सुरक्षित असला तरी हा जिल्हा मध्य प्रदेश आणि गुजरातच्या सीमेवर आहे. शिवाय जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या साक्री तालुक्यातही कोरोनाचे रुग्ण आढळल्याने तो एक चिंतेचा विषय आहे. या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी जिल्ह्याच्या सीमावर्ती गावांमध्ये प्रशासनाने ग्रामस्थांनाच प्रोत्साहीत करून स्वतंत्र ग्रामसुरक्षा दल स्थापन केले आहे. जवळपास दीडशेपेक्षाही अधिक गावांमध्ये हे दल स्थापन झाले असून गावातील नागरिक आता स्वत: गावाच्या सीमांची सुरक्षा करीत आहेत. बाहेरचे कुणीही व्यक्ती जिल्ह्यात येऊ नये यासाठी गाव सीमांचे रक्षण करीत आहेत.
खबरदारीच्या सर्व उपाययोजना होत असल्या तरी लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात जाताना अजूनही ज्या छोट्या - छोट्या काही त्रुटी आहेत त्या निश्चितच सर्वांना दूर कराव्या लागणार आहेत. सीमा सर्व बंद असल्या तरी छुप्या मार्गाने कुणी पायी तर कुणी मुख्य मार्गावर पोलिसांना भूल देत वाहनाने बाहेरील लोक परतत आहेत. दोन दिवसांपूर्वी एका खेड्यावर थेट मजूर घेऊन आलेली ट्रक आली होती. रात्रीच्यावेळी लोकांना त्याची चुणूक लागल्याने त्या सर्व मजुरांची तपासणी करून त्यांना क्वारंटाईन करण्यात आले. अशा काही घटना ठिकठिकाणाहून ऐकू येत आहेत. त्यामुळे बाहेरील लोक जिल्ह्यात येणारच नाहीत याची काही दिवस काळजी घ्यावी लागणार आहे. जर आलेच तर त्यांची घरात प्रवेश करण्यापूर्वी तपासणी करून त्यांनी स्वत: क्वारंटाईन करून घेण्याची गरज आहे. भाजी विक्रेत्यांची संख्या अलिकडे खूप वाढली आहे. काही विक्रेते मास्क न लावता भाजी विक्री करीत असल्याचे दिसून येते. त्यावरही लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. बँकेतील व रेशन दुकानातील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी आणि तेथे सोशल डिस्टन्सिंग पूर्णपणे पाळण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
नंदुरबार जिल्ह्यात सध्या एकही कोरोनाचा रुग्ण नसल्याने ग्रीन झोनमध्ये असला तरी केवळ ग्रीन झोनच नव्हे तर कोरोनामुक्त जिल्ह्याची ओळख कायम टिकविण्यासाठी दुसºया टप्प्यातही सर्वांना अधिक गांभीर्याने काळजी घेण्याची गरज आहे. २० एप्रिलनंतर पंतप्रधानांचा सूचनेनुसार लॉकडाऊनमध्ये शिथीलता येण्याचे संकेत असले तरी नियमांची पायमल्ली होणार नाही याची सर्वांनीच खबरदारी पाळण्याची गरज आहे.

Web Title: Let's model the 'Nandurbar pattern' of Corona liberation ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.