रांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणी येथील शेतशिवारात बिबट्याची दहशत कायम असून, यामुळे शेतकरी व शेतमजुरांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
याबाबतचे वृत्त असे की, मंगळवारी दुपारी १२ ते १ वाजण्याच्या दरम्यान यशवंत उखा बोराणे यांच्या उसाच्या बांधावर शिवाजी टेट्या पाडवी यांची शेळी चरत असताना उसाच्या शेतातून बिबट्याने शेळीवर हल्ला करीत तिला मृत्युमुखी पाडल्याची घटना घडली. रांझणी शेतशिवारात भरदिवसा बिबट्याचा मुक्त संचार वाढल्याने शेतकरी, शेतमजूर व ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण पसरले असून, या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे. या घटनेची माहिती कळताच तळोदा वन विभागाचे वनक्षेत्रपाल नीलेश रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली राणीपूरचे वनपाल नंदू पाटील, वनरक्षक वीरसिंग पावरा, वनरक्षक राजा पावरा, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नवले यांनी घटनास्थळी भेट देऊन पंंचनामा केला.