रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जागृती आणि दैनंदिन व्यवहारातील वागणुकीबाबत ग्रामीण भागातील जनतेला ऐरवी शहरी लोक हिनवत असतात. मात्र कोरोना रोखण्यासाठी नव्हे तर ही साथ आपल्या गावापर्यंत येऊ न देण्यासाठी या वेळी मात्र सातपुड्यातील आदिवासी व ग्रामीण जनता शहरी जनतेपेक्षा एक पाऊल पुढे असल्याचे चित्र आहे. विविध गावांमध्ये बाहेरील कोरोना लागणचा रूग्ण अथवा संशयीत आपल्या गावापर्यंत येऊच नये यासाठी गाव बंदीसह विविध प्रयोग राबवित आहेत.कोरोना या विषाणु जन्य आजाराने संपूर्ण जग हादरले आहे. देशातही त्याचे पडसाद सुरू झाल्याने खबरदारीच्या अनेक उपाययोजना सरकारतर्फे सुरू आहेत. विशेषत: २२ मार्चच्या जनता कर्फ्यु त्यानंतर संचारबंदी आणि लॉकडाऊनचा अर्थ सातपुड्यातील आदिवासी भागात व सातपुड्याच्या पायथ्यालगत असलेल्या ग्रामीण जनतेला चांगल्यापैकी आकलणास आला आहे. लॉकडाऊनची स्थिती असतांना शहरी भागातील लोक कुठले ना कुठले बहाणे बनवून बाहेर फिरण्याचा प्रयत्न करीत आहेत तर दुसरीकडे ग्रामीण भागातील जनता मात्र आपण बाहेर पडायचे नाही पण अनोळखी व्यक्तीलाही गावात येऊ द्यायचे नाही यासाठी प्रयत्न करीत असल्याचे चित्र आहे.गेल्या तीन-चार दिवसातील चित्र पाहिल्यास तळोदा तालुक्यातील सावर, इच्छागव्हाण यासह अनेक गावातील लोकांनी गावात बाहेरील व्यक्तिंनी प्रवेश करूच नये अशी सक्त ताकीद असलेले फलक लावले आहेत. तर मालदा येथील तरूणांनी रस्त्यांवर येऊन गावात कोणी अनोळखी व्यक्तीने येऊ नये यासाठी गावातील चारही बाजूच्या रस्त्यांच्या सीमा बंद केल्या आहेत. बामखेडा, ता.शहादा येथील महिला सरपंचांनी गावात चौका-चौकात मैफिल रंगविणाऱ्या तरूणांनी एकत्र येऊ नये व चावडीवरच्या गर्दीला आळा बसावा यासाठी विविध चौकातील बाकांवरच शेण टाकून लोकांना एकत्र येण्यापासून रोखले.सातपुड्यातील आदिवासी भागातही कोरोनापासून बचावाचे विविध प्रयोग दिसून येताहेत. या भागात बोलीभाषेतील लोकगीते, ध्वनी फिती या द्वारे तर जागृती होत आहेच पण अनेक गावातील लोकांनी आता बाहेरील व्यक्तींसाठी व वाहनांसाठी रस्तेच बंद केले आहेत. विशेषत: सिसा, ता.धडगाव व जामली, ता.अक्कलकुवा या दोन्ही गावातील लोकांनी गावाला येणाºया रस्त्यांवर मोठ-मोठे दगड ठेवून पूर्ण रस्तेच बंद केले आहेत. लॉकडाऊन असल्याने गावातील लोकांनीही बाहेर जाऊ नये व बाहेरील लोकांनीही गावात येऊ नये यासाठी असे प्रयोग केले जात आहे. या भागात रोजगाराची साधने नसल्याने लोकांना रोजच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न असला तरी सद्या कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी येथील लोकही अधिक सज्ज व जागृत झाले आहेत.
कोरोना रोखण्यासाठी ग्रामीण भागात अभिनव क्लुप्त्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 12:43 IST