वाढत्या अतिक्रमणाला कुणाचा अभय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 11:38 AM2019-12-17T11:38:55+5:302019-12-17T11:39:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहाद्यातील अतिक्रमण हटावनंतर तळोद्यात प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु नंदुरबारात गेल्या अनेक दिवसांपासून मागणी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहाद्यातील अतिक्रमण हटावनंतर तळोद्यात प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु नंदुरबारात गेल्या अनेक दिवसांपासून मागणी असूनही तसेच पालिकेने जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्षभरापूर्वी पत्र देवूनही नंदुरबारातील अतिक्रमणांना अभय दिला जात असल्याच्या प्रतिक्रीया शहरवासीयांच्या आहेत.
जिल्हा मुख्यालयाचे शहर असल्यामुळे पालिकेतर्फे शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु वाढत्या अतिक्रमणामुळे शहराला बकाल स्वरूप आले आहे. अतिक्रमण काढण्यासंदर्भात वेळोवेळी मागणी होऊनही त्याकडे पालिका आणि जिल्हा प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे अतिक्रमणधारकांचे चागलेच फावले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी शहादा व तळोद्याबाबत मनावर घेतल्यानंतर आता नंदुरबारबाबतही सक्त पाऊल उचलावे अशी अपेक्षा शहरवासीयांकडून व्यक्त होत आहे.
रस्ते झाले अधिकच अरुंद
शहरातील रस्ते आधीच अरुंद व चिंचोळे आहेत. त्यात अतिक्रमण अधीक वाढल्याने या रस्त्यांवरून दोन वाहने निघणेही मोठे जिकरीचे ठरते. त्यामुळे वारंवार वाहतुकीची कोंडी होणे, लहान, मोठे अपघात होणे असे प्रकार होतात. अनेकांनी घराचे, दुकानांचे ओटे वाढवून घेतले, पुढेपर्यंत पायºया आणल्या आहेत. काहींनी पत्र्यांचे शेड तयार करून घेतले आहे.
बºयाच दुकानदारांनी दुकानासमोर विक्रीचा माल ठेवला आहे. त्यामुळे रस्ते पुर्ण ब्लॉक होत आहेत. वाहनचालकांना वाहन चालवितांना मोठी कसरत होते. या बाबी पालिकेच्या अख्त्यारीतील असतांनाही पालिका याबाबत नेहमीच दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.
चौकांना आले बकालपण
शहरातील मुख्य चौकांना फेरीवाल्यांनी बकाल स्वरूप आणले आहे. कुठलीही शिस्त न ठेवता कुठेही आणि कशाही पद्धतीने लॉरी व वस्तू आणि भाजीपाला विक्रीची दुकाने लावली जात आहेत. त्यात जुनी पालिका चौक ते नेहरू चौक, दिनदयाल चौक रस्ता, सुभाष चौक, अमृत चौक, मंगळ बाजार, तूप बाजार, शास्त्री मार्केट, जळकाबाजार, सिंधी कॉलनी या भागाचा समावेश आहे. अशा ठिकाणी बाजारात जाण्यासाठी महिला वर्ग धजावत नसल्याची स्थिती आहे.
बाजाराच्या दिवशी तर मोठी समस्या निर्माण होते. बाजारात दुचाकी व तिनचाकी वाहने नेण्यास बंदी घालणे अपेक्षीत असतांना त्याबाबत कुठलीही कार्यवाही केली जात नाही. पूर्वी बाजाराच्या दिवशी वाहनांना बंदी राहत होती. आता मात्र सर्रास वाहने ये-जा करीत असतात. त्यामुळे वाद होऊन प्रकरण हाणामारीपर्यंत देखील जाते.
पोलीस चौकी हरवली
मंगळ बाजारात मंगळ गेट पोलीस चौकी आहे. या चौकीलाच विविध वस्तू, भाजीपाला, फळे विक्रेत्यांनी वेढा घातला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पोलीस चौकी आहे की नाही हाच प्रश्न निर्माण होतो. पोलिसांनाच अतिक्रमणधारकांनी वेठीस धरले तर सर्वसामान्यांची काय गत अशी स्थिती येथे आहे. हीच परिस्थिती जळका बाजार पोलीस चौकीच्या परिसरात देखील आहे.
पक्के अतिक्रमणेही...
शहरात कच्चे अतिक्रमणाबरोबर पक्के अतिक्रमण देखील मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. अनेकांनी परवाणगी नसतांना बांधकाम केले आहेत. दादागिरी, राजकीय वरदहस्त आणि पालिकेला न जुमानणाºयांचे हे अतिक्रमण आहे.
पालिका कारवाई करतांना लहान व कच्चे अतिक्रमणांवर कारवाई करते. परंतु पक्के अतिक्रमण धारकांवर कारवाईची हिंमत पालिकेची होत नाही. त्यामुळे अतिक्रमण हटवितांना सर्वांनाच समान न्याय दिला जावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
वर्षभरापूर्वी पालिकेने तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्र देवून अतिक्रमण काढण्यासंदर्भात मागणी केली होती. परंतु जिल्हाधिकारी कार्यलय स्तरावरून वर्षभरापासून काहीही हालचाल झाली नसल्याचे दिसून येते.
अतिक्रमण काढण्याची जबाबदारी ही पालिकेची असतांना पालिका मात्र जिल्हाधिकाऱ्यांकडे टोलवत आहे. यामुळे अतिक्रमणाचा प्रश्न नंदुरबारात निकाली लागणे मोठे जिकरीचे असल्याचे दिसून येत आहे.
आतातरी पालिकेने आणि जिल्हाधिकाºयांनी गांभिर्याने घेवून अतिक्रमण काढण्यासंदर्भात कडक कार्यवाही करून निर्णय घ्यावा अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे.