लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील कोयलीविहीर ते खाई दरम्यान वाडीखाडीपाडाजवळ व रायसिंगपूर-गोरजाबारी ते ओहवा दरम्यान बर्डीपाडा सरपचपाडाजवळ दरडी कोसळून रस्त्यावर दगड व मातीचा मलबा साचल्याने हे रस्ते गेल्या दोन दिवसांपासून बंद पडले आहेत. या रस्त्यांवरुन मोटरसायकलदेखील निघत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे.सातपुडय़ाच्या पर्वत रांगांमधील घाट सेक्शनच्या भागात गेल्या चार दिवसांपासून पावसाच्या संततधारेमुळे दरडी कोसळून रस्त्यावर मोठमोठे दगड व मातीचा मलबा कोसळून पडत असल्याने वाहनधारकांना त्रासदायक व अडचणीचे झाले आहे. घाट सेक्शनच्या कोयलीविहीर-कंकाळामाळ ते सिद्धीपाडा-खाई दरम्यान वाडीखाडीपाडाजवळ दोन-तीन ठिकाणी गेल्या दोन दिवसांपासून मातीचा मलबा कोसळून पडल्याने रस्ता पूर्ण बंद पडला आहे. या रस्त्यावरुन दुचाकीदेखील निघत नसल्याने ईराईपाडा, सावरखाडीपाडा, बर्डीपाडा, ओहवा या गाव व पाडय़ांवरील नागरिकांना अडचणीचे व गैरसोयीचे झाले आहे. रायसिंगपूर-गोरजाबारी ते ओहवा दरम्यान बर्डीपाडा सरपचपाडाजवळही दोन-तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने दरडी कोसळून या रस्त्यावरही दगड व मातीचा मलबा पडल्याने दोन-तीन दिवसांपासून हा रस्ताही बंदच आहे. संबंधित विभागाने या रस्त्यांवरील दगड व माती हटवून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी खाईच्या सरपंच शेमटीबाई पाडवी, गुलाबसिंग ओजमा पाडवी, राशा राया पाडवी व त्रस्त वाहनधारकांनी केली आहे.दरम्यान, सातपुडय़ातील दुर्गम भागात पाच-सहा दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने नदी-नाल्यांनाही पूर आले आहेत. अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील अनेक ठिकाणी नदी-नाल्यांवर पूल नसल्याने त्या गाव व पाडय़ातील नागरिकांचा संपर्क तुटला आहे.
पावसामुळे सातपुडय़ातील दळणवळणावर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 12:31 IST