हिंमत असेल तर अपात्र करून दाखवाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 12:10 PM2020-10-27T12:10:15+5:302020-10-27T12:11:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जतनेच्या हितासाठी सहा महिन्यांची घरपट्टी माफ करण्याची मागणी करून ठराव केला. यामुळे जर पालिका ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जतनेच्या हितासाठी सहा महिन्यांची घरपट्टी माफ करण्याची मागणी करून ठराव केला. यामुळे जर पालिका हिताच्या आड येण्यामुळे भाजप नगरसेवकांना हिंमत असेल तर अपात्र करूनच दाखवा असे आव्हान देत महिनाभरात घरपट्टी माफीचा निर्णय झाला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा भाजपचे डॅा.रवींद्र हिरालाल चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिला.
सहा महिन्याची घरपट्टी माफ करण्याचा ठराव पालिका सभेत झाल्याचा दावा करून भाजप नगरसेवकांनी बॅनरबाजी केली होती. त्यावरून राजकीय वाद उफाळला आहे. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकार परिषद घेऊन असा ठराव झालाच नसल्याचे व्हिडीओ फुटेज दाखवून दूध का दूध आणि पाणी का पाणी झाल्याचे सांगितले होते. शिवाय पालिकेच्या हिताआड येणाऱ्या भाजप नगरसेवकांना अपात्र करण्याची कारवाई करण्याचा इशारा देखील दिला होता. त्यावर भाजपतर्फे डॅा.रवींद्र चौधरी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, पालिकेतील गटनेते चारूदत्त कळवणकर आदींसह नगरसेवक उपस्थित होते. डॅा.रवींद्र चौधरी यांनी सांगितले, माजी आमदार रघुवंशी हे शिवसेनेचे नेते, त्यांच्या नगराध्यक्षा व नगरसेवक कॅांग्रेसचे असे असतांना ते पत्रकार परिषद घेतातच कशी? असा प्रश्न उपस्थित केला. त्यांनी दाखलेले व्हिडीओ फुटेज हे अपुर्ण व कटछाट करून दाखविले आहे.
आम्ही मुख्याधिकारी यांच्याकडे फुटेज मागितले तर त्यांनी बैठकीच्या वेळी ऑनलाईन व्यत्यय येत होते. असे उत्तर दिले आहे. ठराव झालेला असून तो भाग व्हिडीओ फुटेजमधून वगळण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. जर लोकांच्या हितासाठी आम्ही नगरपालिकेच्या हिताआड येणार असू तर नगरसेवकांवर बडतर्फीची कारवाई करून दाखवाच असे आव्हान देखील त्यांनी दिले. नगराध्यक्षांना धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यावर त्यांनी सांगितले, जर नगराध्यक्षांनी कारवाईचा इशारा दिला तर आम्ही केवळ नागरिकांच्या हिताचा निर्णय झाल्याने बॅनर लावले. ते काढून दाखवाच असे आवाहन दिले तर येथे धमकीचा विषय येतोच कुठे. नगराध्यक्षांचा आम्ही सन्मान करतो व यापुढेही करणार असेही त्यांनी सांगितले.
पालिकेच्या मालमत्ता ज्या त्यांच्या संस्थांना चालवायला दिल्या आहेत त्यांची घरपट्टी माफ होत असेल, पालिका त्यांचे वीज बील भरत असेल तर सामान्य नागरिकांची घरपट्टी माफ करण्यात कुठल्या कायदेशीर अडचणी येतात? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
येत्या महिनाभरात आम्ही सहा महिन्याची घरपट्टी माफ करण्याच्या निर्णयाची वाट पहात आहोत. जर निर्णय झालाच नाही तर भाजपतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी डॅा.चौधरी यांच्यासह विजय चौधरी यांनी दिला. चारूदत्त कळवणकर यांनी प्रास्ताविक केले.
शहर दुसऱ्या महामारीच्या उंबरठ्यावर...
विजय चौधरी यांनी सांगितले, भाजपच्या १२ नगरसेवकांनी रघुवंशी यांच्या एकछत्री कारभाराला लगाम घातला आहे. त्यामुळे त्यांची चिडचीड वाढली आहे. भुमीगत गटारींचे पाणी रस्त्यांवर वाहत आहे. शहरात डास, मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला आहे. दुसऱ्या महामारीला जनतेला सामोरे जावे लागत आहे. रस्ते खड्ड्यात गेले आहेत, असे असतांना पालिका या मुलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष करून त्यांच्या मालकीच्या जागांवर रस्ते करण्यात व्यस्त असल्याचा आरोप त्यांनी केला.