सांडपाण्याच्या दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 12:51 PM2020-06-05T12:51:43+5:302020-06-05T12:51:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील जुना प्रकाशा रोडला लागून असलेल्या साळी गल्ली भागात तुटक्या व काही ठिकाणी गटारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरातील जुना प्रकाशा रोडला लागून असलेल्या साळी गल्ली भागात तुटक्या व काही ठिकाणी गटारी बुजल्या गेल्याने सांडपाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी जागा नसल्यामुळे या परिसरात असलेल्या खाजगी मोकळ्या जमिनीवर मोठ्या प्रमाणावर सांडपाण्याची डबके साचल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्याचप्रमाणे परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पालिकेने याकडे लक्ष देऊन साचलेल्या पाण्याचा त्वरित निचरा होण्यासाठी सोय करावी, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
जुना प्रकाशा रोड भागाला लागून गांधी चौक, गुजर गल्ली, साळी गल्ली या शहराच्या मध्यभागी असलेल्या जुन्या वसाहती आहेत. या वसाहतीतील घरांमधील सांडपाण्याचा निचरा याच गटारीमधून केला जातो. तेच पाणी पुढे जाऊन नदीपात्रात सोडले जाते. मात्र साळी गल्लीत काही ठिकाणी गटारी जीर्ण व तुटक्या झाल्याने बुजल्या गेल्या आहेत. त्यामुळे सांडपाणी गटारीतून न वाहता या भागातील वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर असलेल्या खाजगी मोकळ्या जागांमध्ये सांडपाण्याचे डबके साचत आहेत. या परिसरात साचून असलेल्या सांडपाण्याच्या निचरा होत नसल्यामुळे परिसराला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या साचलेल्या पाण्यामुळे परिसरात वराहांचाही वावर वाढल्याने त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
एकीकडे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच या सांडपाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून विविध आजार डोके वर काढत असल्याने नागरिकांना आजारांना बळी पडावे लागत आहे. या साठलेल्या पाण्याच्या डबक्यामध्ये वराहांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्याचप्रमाणे परिसरातील मुलांना खेळण्यासाठी जागा नसल्याने ही मुले या डबक्याजवळच खेळत असल्याचे चित्र आहे.
सांडपाणी ज्याठिकाणी साचत आहे. त्याठिकाणी या भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांनी गुरे बांधण्यासाठी व शेतीची अवजारे ठेवण्यासाठी खळे तयार केले आहेत. मात्र गटारच बुजली गेल्याने हे सर्व सांडपाणी हळूहळू आता खळ्यांमध्ये यायला सुरुवात झाल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाच्या संबंधित अधिकाºयांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित दुरुस्ती करून उपाययोजना करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.