१२ वर्षे घरापासून दुरावलेल्या अकोल्याच्या युवकाला गुजरातच्या दातृत्त्वाचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:29 IST2021-02-12T04:29:42+5:302021-02-12T04:29:42+5:30
साधारण १२ वर्षांपूर्वी अर्थात २००९ साली बन्सीलाल राजाराम केवट हा युवक शिक्षण सुरू असताना मानसिक स्थिती बिघडल्याने घरातून कोणालाही ...

१२ वर्षे घरापासून दुरावलेल्या अकोल्याच्या युवकाला गुजरातच्या दातृत्त्वाचा आधार
साधारण १२ वर्षांपूर्वी अर्थात २००९ साली बन्सीलाल राजाराम केवट हा युवक शिक्षण सुरू असताना मानसिक स्थिती बिघडल्याने घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेला होता. कुटुंबाने त्याचा अनेक राज्यांमध्ये शोध घेतला होता. दरम्यान, अहमदाबाद येथील मंगल मंदिर मानव सेवा परिवार या बेवारस लोकांसाठी काम करणाऱ्या संस्थेला बन्सीलाल केवटे मिळून आले होते. सुमारे एक हजार निराधार बेवारस लोकांना या संस्थेने आजवर घरी सोडले आहे. या संस्थेचे सर्वेसर्वा असलेल्या दिनेश लाठिया यांनी बन्सीलाल याची सेवा शुश्रूषा करत त्याची चाैकशी करून गावाची माहिती मिळवली होती. यातून अकोला येथे संपर्क करून केवट कुटुंबीयांचा शोध घेतला होता. तब्बल १२ वर्षे घरातून बेपत्ता असलेल्या मुलाचा ठावठिकाणा मिळाल्याने केवट कुटुंबातील निवडक सदस्य त्यांना घेण्यासाठी अहमदाबाद येथे गेले होते. तेथून परत येत असताना हे सर्व सारंगखेडा येथे थांबले असताना केवट कुटुंबीयांनी लोकमत प्रतिनिधीसोबत संपर्क करत माहिती दिली.
अहमदाबाद येथे संस्थेत दाखल असलेल्या बन्सीलाल यानेही कुटुंबातील सदस्यांना ओळखले होते. खातरजमा म्हणून अकोला पोलिसांनी पत्र दिले होते. यानुसार पुतण्या अनिल राम लखन केवट, प्यारेलाल रामसुख सेट केवट, भाऊ नंदलाल राजाराम केवट, भाचा दीपेश दिनेश केवट, मुकेश राजकुमार केवट हे बन्सीलाल यास घेण्यासाठी अहमदाबाद येथे गेले होते.
अहमदाबाद येथील मंगल मंदिर मानव सेवा परिवार या संस्थेचे अध्यक्ष म्हणून दिनेश लाठिया हे काम पाहतात. समाजसेवेचे व्रत हाती घेऊन त्यांनी रस्त्यावर फिरणारे निराधार, बेवारस रोगी यांच्यासाठी २००६ पासून ही संस्था सुरू केली. या संस्थेने देशात तब्बल ६३४ जणांना त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचते केेले आहे. यात महाराष्ट्रातील ६५ लोकांचा समावेश आहे. संस्थाचालक दिनेश लाठिया यांना याबाबत विचारणा केली असता, महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील सीमेवरदेखील असे अनेक बेवारस निराधार लोक आढळून येतात. त्यांच्यासाठीही काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, त्यांच्या संस्थेत २६० जण असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली.