तळोदा : शासनाच्या रेशन माल वितरणासंदर्भात जिल्हा पुरवठा विभागाने नवीन गाइड लाइन्स दिल्या असून या महिन्यात शहरात चारच दिवस दुकाने उघडून सकाळी सात ते दुपारी एक वाजेपावेतोच ग्राहकांना माल देण्याचे सूचित केले आहे. तथापि ग्रामीण भागात संपूर्ण आठवडाभर वाटप करण्याचा सूचना दिल्या आहेत. तर मालवाटपात ग्रामीण, शहरी भागात केलेल्या दुजाभावाबाबत लाभार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. निदान शहरी भागातदेखील ग्रामीणप्रमाणेच निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा आहे.
कोरोना महामारीचा सध्या संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड वेगाने संसर्ग वाढत आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिकच वाढत आहे. साहजिकच जिल्हा प्रशासनाबरोबरच स्थानिक प्रशासन ठोस उपाययोजना करीत आहे. जिल्ह्यात लॉकडाऊनसारख्या उपाययोजनादेखील हाती घेतल्या आहेत. जिल्हा पुरवठा विभागानेदेखील जिल्ह्यातील रेशनच्या माल वितरणाबाबत दुकानदारांना नवीन गाइड लाइन्स जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिल्या आहेत. शहरी भागातील रेशन दुकाने सोमवार ते गुरुवार सकाळी सात वाजल्यापासून एक वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र ग्रामीण भागात ही दुकाने संपूर्ण आठवडाभर नियोजित वेळेत म्हणजे सकाळी आठ ते एक अशी चालू ठेवावीत. अनावश्यक गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. शिवाय सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याचे सूचित केले आहे. त्याचबरोबर ४५ वर्षांवरील दुकान मालकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस टोचून घेण्याची सूचना आदेशात दिली आहे. विशेष म्हणजे जास्तीत जास्त ऑनलाइन पेमेंटवर भर देण्याचेदेखील नमूद केले आहे. असे असले तरी माल वितरणाबाबत पुरवठा विभागाने शहरी व ग्रामीण असा दुजाभाव केला आहे. कारण शहरास चार दिवस तर ग्रामीणसाठी संपूर्ण आठवडा दिला आहे. वास्तविक शहरातील लाभार्थीदेखील मोलमजुरी करून आपला जीवन चरितार्थ चालवत असतात. साहजिकच या वेळी शेतावर कामाला असल्यामुळे इकडे वेळेवर रेशन आणू शकत नाही. यामुळे याबाबत फेरनिर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.
शिवभोजन थाळीबाबतही सूचना
राज्य शासनाने समाजातील गरीब घटकांसाठी सुरू केलेल्या शिवभोजन थाळीबाबतही पुरवठा विभागाने नवीन सूचना जारी केल्या आहेत. केंद्रांवरीलही सेवा पार्सलद्वारेच लाभार्थ्यांना देण्यात यावी. यासाठी संबंधित लाभार्थींची मोबाइलने फोटो, आधारकार्ड नोंदणी करून लगेच पार्सल द्यावे. कुठल्याही परिस्थितीत केंद्रामध्ये लाभार्थ्यास जेवण देऊ नये. असे आढळून आले तर तत्काळ कारवाई केली जाईल, असेही नमूद करण्यात आले आहे. गर्दी होणार नाही याचीदेखील संचालकांनी दक्षता घ्यावी आदी सूचना आहेत.
खापर परिसरात मोबाइल सेवेला अडचण
खापर : येथे व परिसरातील बी.एस.एन.एल. टेलिफोन व मोबाइल सेवा तीन दिवसांपासून बंद असल्याने बँकिंग व इतर व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान होत आहे.
खापर परिसरात बी.एस.एन.एल. या कंपनीची टेलिफोन व मोबाइल सेवा वापरणारे ग्राहक मोठ्या प्रमाणावर असून इतर कंपन्यांचा कॉलिंग दर व बी.एस.एन.एल.च्या कॉलिंग दरात बरीच तफावत असल्याने बहुसंख्य ग्राहक बी.एस.एन.एल.चे मोबाइल सिम वापरत असून थ्रीजी सेवा चांगली मिळत असल्याने अनेकांचा कल हा या शासकीय कंपनीकडेच आहे. परंतु गेल्या तीन दिवसांपासून बी.एस.एन.एल.ची सेवा पूर्णतः बंद असल्याने ग्राहकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत असून सेवा सुरळीत करण्याची मागणी केली जात आहे.
खापर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाची शाखा गेल्या पंधरा दिवसांपासून बंद असल्याने या बँकेत खाते असणाऱ्या खातेधारकांची मोठी पंचाईत झाली असून पैसे भरणे व काढण्याचे व्यवहार थांबून गेले आहेत.
येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेची अत्यंत दैनावस्था झाली असून याकडे कुणीही वरिष्ठ अधिकारी लक्ष देत नसल्याने येथील शाखेला तब्बल पंधरा दिवसांपासून कुलूप लागलेले असून शाखा कधी उघडेल हेही निश्चित माहीत नसल्याने ग्राहकांना असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
येथे बदलीवर दिलेले शाखा व्यवस्थापक यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर बँक बंदच आहे, कारण शाखेत एक शाखा व्यवस्थापक, एक कॅशियर व एक शिपाई अशा तीनच कर्मचाऱ्यांवर बँक सुरू असताना शाखा व्यवस्थापक कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानंतर, शाखेत दोनच कर्मचारी राहिले. त्यातही दुसरा कर्मचारीदेखील आजारी झाल्यानंतर येथील शाखा बंद करण्यात आली असून तब्बल पंधरा दिवसांपेक्षा जास्त कालावधी होऊनही शाखेचे कुलूप जैसे थे असून येथील शाखेत बदली कर्मचारीसुद्धा येत नसल्याने पगाराची खाती असलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहेत तर विविध शासकीय योजनांतील अनुदान यासह व्यापारी वर्गातील दररोजचे व्यवहार प्रभावित झालेले असून मध्येच आलेल्या सुट्ट्यांमुळे जनतेचा पैसा बैंकेत असूनही तो काढता येत नसल्याने जनता पूर्ण हवालदिल झाली असून याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालण्याची मागणी त्रस्त जनता करीत आहे.