लोकमत न्यूज नेटवर्कमोदलपाडा : तळोदा तालुक्यातील रामपूर शिवारात बिबट्याचा संचार असल्यामुळे या परिसरातील शेतकरी व स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.रामपूर येथील दाम्या रामजी नाईक यांच्या शेतात असलेल्या गोठ्यातील शेळी बिबट्याने फस्त केल्याची घटना घडली. याबाबत रामपूर येथील पोलीस पाटलांनी वनविभागाला कळविल्याने घटनास्थळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी येऊन पंचनामा केला. याच परिसरात पाच दिवस अगोदरही एक शेळी मृतावस्थेत आढळली होती. बिबट्याच्या वास्तव्यामुळे शेतकरी व शेतमजूर चिंतेत असून आजूबाजूला सर्वत्र उसाचे क्षेत्र असल्याने कोणाचीही आत घुसण्याची हिंमत होत नाही. सध्या शेतातील कापूस वेचणी, सोयबीन कापणी आदी कामे जोरात सुरू असताना बिबट्यांची भटकंती होत असल्याने रामपूर परिसरातील वळफळी, शेलवाई,अंमलपाडा आदी गावातील ग्रामस्थ शेतात जायला घाबरत आहेत. त्यामुळे वनविभागाने या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
बिबट्याच्या वास्तव्याने शेतकऱ्यांमध्ये भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 12:41 PM