लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तालुक्यातील पाच ग्रामसेवकांच्या बेकायदेशीर बदल्याप्रकरणी तळोदा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी तीन दिवसांची मुदत देऊनही आपले म्हणणे जिल्हा परिषदेस सदर केलेले नाही, त्यामुळे त्यांच्या विरोधात शिस्तभंगाच्या कारवाईच्या प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे आता पुढील कार्यवाहीकडे पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे. तळोदा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी एस.बी. खर्डे यांनी काही महिन्यांपूर्वी तळोदा तालुक्यातील पाच ग्रामसेवकांच्या तालुक्याअंतर्गत बदल्या केल्या होत्या. या प्रकरणी काही पदाधिकाऱ्यांनी आपले सरकार पोर्टलवर जिल्हा परिषदेकडे तक्रार केली होती. त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून बदल्यांचा अहवाल मागवला होता. या अहवालात त्यांनी शासनाने केलेल्या सर्वसाधारण बदल्यांची माहिती देऊन दिशाभूल केली असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. शिवाय ज्या ग्रामसेवकाबद्दल पदाधिकाऱ्यांची तक्रार होती, अशा ग्रामसेवकांची चौकशी करून तसा अहवाल इकडे सादर करण्याचा देखील शासनाच्या नियम आहे. परंतु त्या नियमाचे उल्लंघन करून अधिकार नसताना बेकायदेशीर बदल्या केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर गटविकास अधिकारी खर्डे यांना जिल्हा परिषद प्रशासनाने २१ जानेवारी रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटीसीनुसार बीडीओ खर्डे यांना तीन दिवसात त्यांचे म्हणणे सादर करून तसा खुलासा जिल्हा परिषदेकडे पाठवण्याची सूचना करण्यात आली होती. या नोटीसीमुळे त्यांच्या उत्तराची प्रतिक्षा लागून होती. परंतू तीन दिवसानंतरही गटविकास अधिकारी खर्डे यांनी खुलासा जिल्हा परिषद प्रशासनाकडे सादर केला नसल्याची माहिती संबधित विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली आहे. त्यामुळे शासनाच्या नियमानुसार गटविकास अधिकारी खर्डे यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही व्हावी यासाठी नाशिक विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान गटविकास अधिकारी असलेल्या व्यक्तीने जिल्हा परिषदेची नोटीस मिळाल्यानंतर खुलासा न केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाची सध्या पंचायत समितीच्या प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात देखील चर्चा रंगली आहे. खर्डे यांनी खुलासा न सादर केल्यामुळे त्यांना बेकायदेशीरपणे बदल्या केल्याचा ठपका मान्य असल्याचा निष्कर्ष निघत असावा अशी चर्चा सध्या सुरु आहे. नेमके याप्रकरणी पुढे काय कारवाई होणार याकडे लक्ष लागून आहे.
तळोदा तालुक्यातील ग्रामसेवकांच्या शासनाच्या नियमाचे उल्लंघन करून करण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर गटविकास अधिकारी एस.बी. खर्डे याना नोटीस बजावली होती. तीन दिवसात म्हणणे सादर करण्याची संधीदेखील त्यांना देण्यात आली. होती. परंतु अजूनही त्यांनी म्हणणे आमच्याकडे सादर केलेले नाही. यामुळे त्यांच्यावरील शिस्तभंगाच्या कारवाईसाठी प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात येईल.-शेखर राैंदळ,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, नंदुरबार.