अन्नातून विषबाधेमुळे एकाच कुटूंबातील आठ जण अत्यवस्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 11:45 AM2019-12-12T11:45:44+5:302019-12-12T11:45:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : अन्नातून विषबाधा झाल्याने एकाच कुटूंबातील आठ जण अत्यवस्थ होऊन बहिण-भावाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकुवा : अन्नातून विषबाधा झाल्याने एकाच कुटूंबातील आठ जण अत्यवस्थ होऊन बहिण-भावाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास दुर्गम भागातील खाईच्या वाडीखाडीपाडा येथे घडली़ सकाळी प्रकृती गंभीर झालेल्या सहा जणांना अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ येथून त्यांना पुन्हा जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले़
वाडीखाडी पाडा येथे घडलेल्या या ह्रदयद्रावक घटनेत जयवंती दमण्या राऊत (१४) व विपुल दमण्या राऊत (दीड वर्ष) या दोघांचा तातडीने उपचार न मिळाल्याने मंगळवारी रात्र ते बुधवारी पहाटेदरम्यान काही तासात मृत्यू झाला़ अक्कलकुवा तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील खाईच्या वाडीखाडी पाड्यावरील दमण्या गोमा राऊत व तुकाबाई दमण्या राऊत या दाम्पत्यावर ही आपत्ती ओढावली़ मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी तुकाबाई राऊत यांनी शेतातून हरभऱ्याच्या रोपांची पाने तोडून घेत सायंकाळी कुटूंबासाठी त्याची भाजी व भाकºया तयार केल्या होत्या़ रात्री मुलगी जयवंती, कविता, दोहरी, नंदनी, मुलगा विपुल आणि गवल्या यांच्यासह पती दमण्या यांना ही भाजी खायला दिली होती़ तुकाबाई यांनीही हीच भाजी भाकरीसह खाल्ली होती़ दरम्यान मंगळवारी रात्री उशिरा जयवंती हीला अचानक उलट्या सुरु झाल्या़ यातच जुलाब आणि उलट्या सुरु होऊन अवघ्या काही तासात तिचा मृत्यू झाला़ तिचा मृत्यू झाल्यानंतर पहाटेच्या सुमारास भाऊ विपुला हाही विषबाधेने दगावला़ राऊत परिवाराच्या इतर सदस्यांनाही त्रास जाणावू लागल्यानंतर वाडीपाडा ग्रामस्थांनी दुपारी अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात आणले होते़ याठिकाणीही सर्वांवर उपचार शक्य नसल्याने त्यांना पुन्हा जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आले़ यातील चौघांची प्रकृती अद्यापही गंभीर असल्याची माहिती आहे़
सायंकाळी साडेपाच वाजेदरम्यान दमण्या राऊत, तुकाबाई, नंदनी, गोवल्या, दोहरी आणि कविता या सहा जणांना जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले़ यात तुकाबाई यांची प्रकृती अधिक गंभीर असल्याची माहिती रुग्णालय सूत्रांकडून देण्यात आली आहे़ सर्व सहा जणांना अतीदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे़ मयत झालेल्या दोघांना तातडीने उपचार न मिळाल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे़ १४ वर्षीय मयत मुलगी जयवंती आणि दीड वर्षांचा भाऊ विपुल या दोघांचे मृतदेह वाडीपाडा येथेच असून आई-वडील आणि भावंडांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत़
वाडीखाडीपाडा सातपुड्यातील अत्यंत दुर्गम भागात असून अत्यवस्थ अवस्थेतील आठही जणांना तेथील ग्रामस्थांनी रायसिंगपूर उचलून आणले होते़ महिलेसाठी थेट बांबूलन्स तर लहान मुलांना खांद्यावर टाकून ग्रामस्थ रायसिंगपूर पर्यंत आले होते़ येथून वाहनाने सर्वांना अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले़ हरभºयाच्या रोपावर फवारणी केल्यानंतर तो न धुताच खाल्ल्याने राऊत कुटूंबाला अपाय झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे़