लॉकडाऊनमुळे रामनवमी साध्या पद्धतीने साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 12:51 PM2020-04-03T12:51:28+5:302020-04-03T12:51:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व मंदिरे बंद असल्याने जिल्ह्यात साध्या पद्धतीने रामनवमी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व मंदिरे बंद असल्याने जिल्ह्यात साध्या पद्धतीने रामनवमी साजरी करण्यात आली.
प्रतापपूर, ता.तळोदा येथील राम मंदिरात रामनवमी उत्सावानिमित्त ४८ वर्षांपासून आयोजित करण्यात येणाऱ्या श्रीमद् भागवत कथा सप्ताहाला यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमिवर शासनाने सर्व कार्यक्रम रद्द केल्याने खंड पडला आहे. या वेळी पुजारी भालचंद्र पाठक व तुंबा राजपूत यांनी पहाटे चार वाजता काकड आरती केली. त्यानंतर सकाळी सात वाजता दिलीप पाटील यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. त्यानंतर दुपारी १२ वाजता रामजन्मोत्सव साजरा करण्यात आल्याची माहिती मंदिर ट्रस्टचे संचालक भिमसिंग गिरासे यांनी दिली.
कहाटूळला रक्तदान शिबिर
कहाटूळ, ता.शहादा येथे रामनवमी निमित्ताने रक्तदान शिबिर घेण्यात आले. कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे देशात मोठे संकट उभे राहण्याची दाट शक्यता आहे. त्या अनुषंगाने राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रक्तदान करण्याचे आव्हान संपूर्ण महाराष्ट्राला केले आहे.
गावात रामनवमीनिमित्ताने गेल्या वर्षापासून श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात येत होते. परंतु कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी जिल्ह्यातील सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना या दिल्या होत्या. त्यामुळे कहाटूळ येथील भागवत समितीने देखील श्रीमद्भागवत कथेचा कार्यक्रम रद्द करून देशातील उद्भवलेल्या संकटाला मदत म्हणून भव्य रक्तदान शिबीर घेतले. शिबिरास ग्रामस्थांनी उस्फुर्त प्रतीसाद दिला शिबिरासाठी रामकृष्ण मंदिराचे पुजारी दीपक कुलकर्णी आणि भागवत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
जिल्ह्यातील राम मंदिरांमध्येही रामनवमीनिमित्त आरती व प्रसाद वाटप करण्यात आला.