लक्षणे असलेल्यांचे अहवाल उशीराने येत असल्याने मृत्यूंचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 12:31 PM2020-08-06T12:31:05+5:302020-08-06T12:31:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाची तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांचा ट्रूनेट व रॅपीड कोरोना चाचणी अहवाल लागलीच मिळत नसल्यामुळे ...

Deaths increased as reports of those with symptoms came in late | लक्षणे असलेल्यांचे अहवाल उशीराने येत असल्याने मृत्यूंचे प्रमाण वाढले

लक्षणे असलेल्यांचे अहवाल उशीराने येत असल्याने मृत्यूंचे प्रमाण वाढले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाची तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांचा ट्रूनेट व रॅपीड कोरोना चाचणी अहवाल लागलीच मिळत नसल्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणने आहे. या दोन्ही चाचण्या लागलीच मिळाव्या अशी मागणी होत आहे.
जिल्ह्यात दररोज किमान एक ते तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. सद्य स्थितीत मृत्यू संख्या ४० झाली आहे. गेल्या महिनाभरात तब्बल ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. पहिले नंदुरबारात ट्रूनेट किंवा रॅपीड टेस्ट करण्याची सोय नव्हती. गेल्या १५ दिवसांपासून या दोन्ही टेस्ट स्थानिक ठिकाणी केल्या जाऊ लागल्या आहेत. त्यामुळे सोय झाली आहे. आरटीपीसीआर टेस्टसाठी मात्र अद्यापही धुळ्यावर अवलंबून राहावे लागत आहे. तेथील अहवाल येण्यास दोन ते तीन दिवस लागत आहेत. ट्रूनेट व रॅपीडच्या चाचण्या देखील १०० टक्के खात्रीच्या नाहीत. २० ते ३० टक्के रिपोर्टमध्ये बदल येत आहेत. असे असले तरी या चाचण्यांचा जास्तीत जास्त उपयोग करून घेत रुग्णांवर उपचार करणे आवश्यक आहे.
कोरोनाबाधीत व जास्त लक्षणे असलेला रुग्ण दाखल होताच त्याची या रॅपीड किंवा ट्रूनेट चाचणी करणे आवश्यक आहे. परंतु किमान एक ते दोन दिवस या दोन्ही चाचण्या अशा रुग्णाच्या केल्या जात नाहीत. तोपर्यंत त्याच्यातील लक्षणे वाढून व वेळीच उपचार न मिळत असल्याने त्याचा मृत्यू होत आहे.
गेल्या आठ ते दहा दिवसात असे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे तीव्र लक्षणे असलेला रुग्ण आल्यास त्याची लागलीच अशी चाचणी करून पॉझिटिव्ह आल्यास संबधीत उपचार सुरू करण्यात यावे. तसे झाल्यास मृत्यूचे प्रमाण कमी होऊ शकते.
दरम्यान, नंदुरबारात आरटीपीसीआर चाचणी प्रयोगशाळा सुरू करण्याची तयारी पुर्ण झाली आहे. ती लवकर सुरू झाल्यास रिपोर्ट लवकर मिळतील व लागलीच रुग्णांवर उपचार देखील करता येणार आहे.
परंतु ही प्रयोगशाळा सुरू करण्याबाबत चालढकलपणा केला जात असल्याचे बोलले जात आहे. ९ आॅगस्टचा मुहूर्त सांगितला जात असला तरी त्या दिवशी देखील सुरू केली जाते किंवा याबाबतही शंका उपस्थित केली जात आहे.

२०० पेक्षा अधीक जणांच्या अहवाल वेटींगवर
मंगळवारी एकाच दिवसात ६८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. गेल्या चार महिन्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर अहवाल आल्याने खळबळ उडाली. शिवाय तीन जणांचा देखील मृत्यू झाला होता. बुधवारी मात्र सायंकाळी उशीरापर्यंत एकही अहवाल प्राप्त झाला नव्हता. शनिमांडळ येथील वृद्धाचा उपचार घेतांना मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यूची संख्या आता ४० झाली आहे. साधारणत: २०० पेक्षा अधीक अहवालांची प्रतिक्षा लागून आहे.

Web Title: Deaths increased as reports of those with symptoms came in late

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.