नंदुरबार : कोरोना काळातील संचारबंदी व लॅाकडाऊनमुळे पाणी जार विक्रीवरदेखील परिणाम झाला आहे. कोरोनाच्या भितीमुळे अनेकांनी जार बंद करून दिले आहेत. तर संचारबंदीमुळे दुकाने, कार्यालये बंद असल्यामुळे जार विक्री निम्म्यापेक्षा कमी झाली आहे. असे असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जार विक्री बऱ्यापैकी असल्याचे चित्र आहे. दरम्यान, विविध ठिकाणची कोविड सेंटर, रुग्णालये या ठिकाणी पाणी जार विक्री बऱ्यापैकी होत असल्यामुळे जार विक्रेत्यांना दिलासा मिळाला आहे.
कोरोनामुळे अनेक व्यवसायांवर परिणाम झाला तसा पाणी जार विक्रेत्यांवर देखील झाला आहे. दररोज हजारो लिटर फिल्टर केलेले पाणी विक्री करणारे आज शेकडो लिटरवर आले आहेत. पाणी फिल्टर करण्याचा खर्चदेखील काही जार विक्रेत्यांना परवडत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे पाणी जार विक्रेत्यांची आर्थिक बाजू डळमळीत झाली आहे. मुख्य उन्हाळ्याचा सिझन हा सर्वाधिक व्यवसायाचा असतो.
लग्न समारंभ नसल्याने मोठा फटका
पाणी जार विक्रेत्यांचा सर्वाधिक व्यवसाय हा लग्न समारंभांच्या काळात होतो. एका लग्न समारंभाच्या ठिकाणी किमान ३० ते जास्तीत जास्त २०० जार लागत असतात. त्यातून विक्रेते मोठा व्यवसाय करून घेतात. याशिवाय इतर सार्वजनिक कार्यक्रमांमध्येदेखील पाणी जारची मागणी मोठी असते. गेल्या दोन वर्षांपासून लग्न समारंभांवर आलेली मर्यादा, सार्वजनिक कार्यक्रमांची बंद झालेली रेलचेल ही बाब लक्षात घेता अनेक व्यावसायिकांना आर्थिक फटका बसला आहे. नजीकच्या काळातदेखील लग्न समारंभ व इतर सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी राहणार असल्याचे स्पष्टच आहे.
कोरोनामुळे भीतीच्या वातावरणाचाही परिणाम
कोरोनामुळे बाहेरील वस्तू आणतांना अनेकजण विचार करतात. आणलेच तर सॅनिटाईज करून घेतात. परंतु पाणी कसे सॅनिटाईज करणार हा प्रश्न असतो. त्यामुळे कोरोनाकाळात पाणी जार नको अशी अनेकांची धारणा आहे.
याशिवाय दुकाने, हॅाटेल्स, बिअरबार, इतर कार्यालये सध्या बंद असल्यामुळे तेथे विक्री होणारे पाणी जार देखील बंद ठेवावे लागले आहेत. त्यामुळे व्यवसाय निम्म्यावर आला आहे. जूनपासून पावसाळा सुरू झाल्यावर पाणी जार मागणी कमी होणार आहे.